Uddhav Thackeray Hingoli Rally : मोदींच्या मंगळसूत्र राजकारणावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. मोदींच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी खरपूस समाचार घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधांनांवर टीकास्त्र सोडलं आहे. मोदीजी तुम्हाला मंगळसूत्राचे महत्व कळलं कधी?' असा खोचक सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे.
पीएम मोदींच्या (PM Narendra Modi) मंगळसूत्रावरील वक्तव्यावरून राजकीय रान पेटवलं जात आहे. आता उद्धव ठाकरेंनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली. हिंगोली लोकसभा (Hingoli loksabha election) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी केंद्र -राज्य सरकारबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी कशावर बोलतात तर कोण काय-काय खातं यावर बोलतात. कोण मासं खातंय,कोण मच्छी खातंय,त्यांची मुलं. कोणाला किती मुलं होणार त्यांना हे काँग्रेसवाले संपत्ती वाटणार. तुम्हाला कसं कळलं कोणाला किती मुलं होतात. जाहीर सभेतून ते महिलांना सांगतात तुमचा दागिना म्हणजे तुमचे मंगळसूत्र हे हिसकावून घेतील. तुमचे सोने जप्त करतील. मोदीजी तुम्हाला मंगळसूत्राचे महत्व कळलं कधी, गेल्या १० वर्षांत?',असा सवालही ठाकरेंनी केला आहे.
काँग्रेस तुमच्याकडील सोने, मंगळसूत्र काढून घेतली व ते मुसलमानांना देऊन टाकतील, कारण त्यांना जास्त मुलं आहेत. तुम्ही जेव्हा असं बोलता तेव्हा माझ्या शेतकऱ्याला विचारा त्यांच्या मुलांची लग्नं करू शकत नाही,पत्नीचे मंगळसूत्र तो विकत घेऊ शकत नाही. कर्जामुळे तो बेजार झाला आहे. त्याच्या घरात मंगळसूत्र येत नाही. असलेले मंगळसूत्र गहाण टाकावे लागते. त्यांच्यासाठी मागच्या १० वर्षात काय दिलं?याचा आधी हिशोब द्या, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे.
राजस्थानमधील एका प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास देशातील मालमत्तेचे सर्वेक्षण करतील. तुमच्याकडे किती संपत्ती आहे, कमाई किती आहे, तपासले जाई. आमच्या माता-बहिणींकडील सोनं-चांदी काढून घेऊन ते सर्वांमध्ये समान वाटले जाईल. माझ्या माता-भगिनींच्या आयुष्यात सोनं हे दाखवण्यासाठी नसून त्यांच्या स्वाभिमानाशी संबंधित आहे.
हे सोनं काढून घेऊन पुढे ज्यांना अधिक मुलं आहेत, त्यांना वाटलं जाईल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातच हे सांगितलं आहे. काँग्रेस म्हणते की देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे. अशा स्थितीत ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना वाटण्याचे काम काँग्रेस करेल. पीएम मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत.