Sharad Pawar PC : राज ठाकरेंच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही; शरद पवारांचा मनसेला खोचक टोला
Sharad Pawar On Raj Thackeray : राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता. त्यानंतर आता त्यांच्या आरोपांना शरद पवारांनी शेलक्या शब्दात उत्तर दिलं आहे.
Sharad Pawar On Raj Thackeray In Kolhapur Today : महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून जातीयवाद वाढल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर मनसेचे नेते प्रकाश महाजन, संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनीदेखील अशाच आशयाचं वक्तव्य करत राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नसल्याचं सांगत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे काहीही आरोप करू शकतात. राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना मधुकरराव पिचड, छगन भुजबळ यांच्यासारख्या अनेक समाजाचे नेते आमच्या पक्षात होते. आणखी नावं सांगण्याची गरज नाही. त्यामुळं त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नसल्याचं सांगत शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक टोला हाणला आहे.
आम्ही शाहु, फुले आणि आंबेकरी विचारांचे लोक असल्यानं जातीचा विषय आमच्या मनात येत नाही. त्यामुळं आमच्यावर कुणीही कितीही टीका केली तर त्याची दखल आमच्याकडून घेतली जात नसल्याचंही शरद पवार म्हणाले. त्याचबरोबर संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणणं यात काहीही चूक नाही. त्यामुळं या मुद्द्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याची गरज नाही, असंही पवारांनी सांगितलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यामुळं पक्षाला गळती लागल्याचं नेहमी सांगितलं जात आहे. परंतु मी गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा दौरा करत असताना सच्चा शिवसैनिक आणि कडवा कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं सांगत शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.