Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज ८ टप्प्यांत मतदान सुरू आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वात कमी टक्के मतदान झाले असताना नांदेडमध्ये एका मतदाराने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदानकेंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित मतदाराला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
भैय्यासाहेब येडके असे ताब्यात घेण्यात आलेल्या मतदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आज दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेला होता. मात्र, ईव्हीएम समोर जाताच त्याने पँटमध्ये लपवून आणलेल्या कुऱ्हाडीच्या तुंब्याने मशीनवर घाव घातला. मतदान केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यांना मोठा आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना आरोपीच्या हातात कुऱ्हाड दिसली. सर्वजण घाबरून केंद्राबाहेर पडले. यानंतर केंद्राबाहेरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.
अमरावती, नांदेड, परभणी, बुलढाणा, यवतमाळ वाशिम, अकोला, वर्धा आणि हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान झाले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी ३.०० वाजेपर्यंत महाराष्ट्रात (४३.०१ टक्के) इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी मतदान झाले. राज्यात सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात झाले. परभणीत ४४.४९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर, अकोला (४२.६९ टक्के), वर्धा (४५.९५ टक्के), बुलढाणा (४१.६६ टक्के), हिंगोली (४०.५० टक्के), नांदेड (४०.५० टक्के) आणि यवतमाळ- वाशिममध्ये ४२.५५ टक्के मतदान झाले.
देशात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत त्रिपुरा राज्यात सर्वाधिक मतदान झाले. त्रिपुरा राज्यात ६८.९२ टक्के मतदान झाले.तर, आसाममध्ये ६०.३२ टक्के, बिहारमध्ये ४४.२४ टक्के, छत्तीसगडमध्ये ६३.९२ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये ५७.७६ टक्के, कर्नाटकमध्ये ५०.९३ टक्के, केरळमध्ये ५१.६४ टक्के, मध्य प्रदेशात ४६.५० टक्के, राजस्थानात ५०.२७ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ६०.६० टक्के आणि महाराष्ट्रात ४३.०१ टक्के मतदान झाले.
संबंधित बातम्या