तेव्हा लोक माफीनामे लिहायचे, शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाच पत्र लिहिली; भाजप नेत्याची जीभ घसरली
Sudhanshu Trivedi On Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श आहेत, आताचे आदर्श नितीन गडकरी आहेत, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यानंतर आता महाराजांवर बोलताना भाजप प्रवक्त्यांचीही जीभ घसरली आहे.
Sudhanshu Trivedi Controversial Statement On Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते, आताचे आदर्श हे नितीन गडकरी आहेत, असं वक्तव्य करून राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या वादाला तोंड फोडलेलं असतानाच आता भाजपच्या एका प्रवक्त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्वीटरवर शेयर करत भाजपवर टीका केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हे 'आजतक' या वृत्तवाहिनीवर बोलत होते, त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्याची राजीनामे लिहित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाच पत्रं लिहिली होती, असं म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहे.
सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्वीटरवर शेयर करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती असा म्हणणारा भाजप प्रवक्ता ठार वेडाच असू शकतो, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं विरोधकांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. त्यातच आता भाजपच्या प्रवक्त्यानं महाराजांवर बोलताना पातळी सोडल्यानं पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.