निवडणूक आयोग बरखास्त करा, ठाकरेंच्या मागणीला भाजपच्या बड्या नेत्याचा जाहीर पाठिंबा
Maharashtra Politics : शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली होती.
BJP leader Subramanian Swamy On Election Commission : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात जारी असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय संघर्ष पेटलेला आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते, प्रकरण प्रलंबित असतानाही एकाच बाजूचा विचार करून निकाल देणाऱ्या निवडणूक आयोगाला बरखास्त करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर भाजपसह शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी टिकास्त्र सोडलं होतं. परंतु आता भाजपचे दिग्गज नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भाजपाचे निष्ठावान नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आणि निवडणूक आयोगाच्या निकालावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीलाही स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्वीटरवर ट्वीट करत म्हटलं आहे की, मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण निवडणूक आयोगाच्या सध्याच्या आयुक्तांचा अर्थमंत्रालयातील कार्यकाळ हा संशयास्पद होता, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी हे अटलबिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय तर इंदिरा गांधी व गांधी कुटुंबियांचे टीकाकार मानले जातात. २०१४ साली देशात सत्तांतर झाल्यापासून सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला केलेला आहे. याशिवाय स्वामी यांनी पीएम मोदी यांच्यावरही अनेकदा टीका केलेली आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून राज्यात राजकीय वादंग पेटलेलं असताना सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळं भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.