Bharat Jodo Nyay Yatra : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ‘ज्या घरातील टीव्हीवर मोदींचा फोटो दिसतो, त्या घराच्या मागे दारिद्र्य लागतं,’ अशी टीका खर्गे यांनी केली आहे.
मध्य प्रदेशातील धार इथं भारत जोडो न्याय यात्रेअंतर्गत आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. खर्गे यांनी देशातील केंद्र सरकारच्या कारभारावर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार आसूड ओढले. ‘तुम्ही टीव्ही चालू करताच टीव्हीवर मोदींचा फोटो दिसतो. ज्या घरात मोदींचा फोटो टीव्हीवर दिसतो, ते घर दरिद्री होऊन जाते, असं खर्गे म्हणाले.
'नरेंद्र मोदींना विकास नको आहे. त्यांना गरिबांचं कल्याण नको आहे. आमची मुलं शिकावीत असं त्यांना वाटत नाही. कारण, गरीब मुलं शिक्षण घेऊन पुढं आली तर त्यांची अडचण होईल. त्यामुळंच मोदी गरिबांना दंडुके दाखवतात. काँग्रेस पक्ष पुढं जाऊ लागला की चिरडण्याचं काम करतात,’ असा आरोप खर्गे यांनी केला.
'आज देशात ४५ वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आहे. देशात दररोज महागाई वाढत आहे. हे सर्व मोदींच्या काळात घडलं आहे. देशातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी संपू नये असं पंतप्रधान मोदींना वाटतं. श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावं आणि गरीबांनी अधिक गरीब व्हावं, अशी मोदींची इच्छा आहे. मोदी म्हणाले होते, मी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देईन, मी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकीन, मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करीन, शेतकऱ्यांना MSP देईल, पण काहीही केलं नाही. मोदी हे 'लबाडांचे सरदार' आहेत,' अशी टीका खर्गे यांनी केली.
खर्गे यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचाही समाचार घेतला. 'खर्गे आणि राहुल गांधी काँग्रेसला संपवण्याचं काम करत आहेत, असं शिवराजसिंह म्हणाले होते. भाजपनं शिवराजसिंह चौहान यांना सत्तेवरून का हटवलं, याचं उत्तर त्यांनी आधी शोधावं, असा टोला खर्गे यांनी हाणला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपच्या कारभारावर व विचारधारेवर टीका केली. 'काही दिवसांपूर्वी भाजप नेता एका आदिवासी तरुणावर लघवी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा कसला विचार आहे? ही भाजपची विचारधारा आहे. हे फक्त आदिवासींसोबतच घडत नाहीये… दलित, आदिवासी आणि गरिबांच्या बाबतीत होत आहे, असा आरोप राहुल यांनी केला.
संबंधित बातम्या