lok Sabha Election : विजय वडेट्टीवारांची मुलगी लोकसभेच्या रिंगणात?; शिवानी वडेट्टीवारांची काँग्रेसकडे तिकीटाची मागणी
Shivani Wadettivar loksabha Election : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे.
Congress Shivani Wadettiwar : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाआघाडीकडून जागावाटप जवळजवळ निश्चित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता सर्वच पक्षातील इच्छुकांनीही कंबर कसली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली होती. त्या चंद्रपूर जागेवर काँग्रेसच्या सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता. मात्र मागील वर्षी त्यांचं निधन झाल्याने ही जागा रिक्त होती.
ट्रेंडिंग न्यूज
आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. चंद्रूपरमधून निवडणूक लढण्यासाठी आपण काँग्रेसकडे तिकीट मागितल्याचं शिवानी यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यादेखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसकडून नक्की कोणाला तिकीट दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट लिहून म्हटले आहे की, गेल्या सात वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असताना खरं तर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करायची होती. मात्र लोकशाही संपवू पाहणाऱ्या या सरकारने जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाहीत. त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार.
काँग्रेसकडे तिकीटाची मागणी करताना शिवानी यांनी म्हटलं आहे की, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी या संघर्ष करत असताना मी देखील त्यात खारीचा वाटा उचलत आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चे काढून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केला. कामगार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विविध स्पर्धा आणि उपक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गाला पक्षाशी जोडले. संसदेत काँग्रेस पक्षाचा आवाज मजबूत करण्यासाठीच ज्येष्ठांपासून ते नवमतदारांचा मला उमेदवारी करण्यासाठी आग्रह आहे. म्हणूनच पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे.