Patna Hotels Fire News: पाटणा रेल्वे स्थानकापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलच्या तीन इमारतींना गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. पाल हॉटेलला लागलेली ही आग आटोक्यात येण्यापूर्वीच आजूबाजूच्या इमारतींमध्ये पसरली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हॉटेल पाल आणि लगतच्या अमृत हॉटेलमधून त्यांना मृतदेह सापडले. अनेकांनाा बाहेर काढून पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
गुरुवारी दुपारी आमच्या रुग्णालयात दाखल झालेल्या एकूण १८ जणांपैकी गंभीररित्या होरपळलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. शस्त्रक्रिया विभागात उपचार घेत असलेल्या १०० टक्के आणि ९५ टक्के भाजलेल्या इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत सहा जणांची अद्याप ओळख पटलेली नाही,' अशी माहिती पीएमसीएचचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आय. एस. ठाकूर यांनी दिली.
अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर घटनास्थळी पोहोचल्या, मात्र व्यस्त आणि सतत वर्दळ असल्याने आग आटोक्यात आणण्यात आणि बचावकार्यात उशीर झाला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अखेर सात ते आठ गाड्यांनी तब्बल दोन तास काम केल्यानंतर आग आटोक्यात आली. पूनम देवी (३३), अमलेश तिवारी (४०), गोरख कुमार (१६), अनुराग सिंग (१३), जितेंद्र कुमार (४७), रोहित कुमार (२२), अरविंद तिवारी (४५), विजय लक्ष्मी (३०), आदित्य पटेल (२३) आणि शेख दलानी (४०) अशी जखमींची नावे आहेत.
होमगार्ड आणि अग्निशमन दलाच्या महासंचालक सह कमांडंट शोभा ओहोटकर यांनी सांगितले की, छतावर अडकलेल्या ४५ हून अधिक लोकांना अग्निशमन दलाच्या पथकाने बाहेर काढले. तर, बऱ्याच लोकांना उपचारासाठी पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरातील गर्दीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना वेळ लागला.
पाल हॉटेलमध्ये लागलेली ही आग लवकरच जवळच्या अमृत हॉटेल आणि इतर इमारतींमध्ये पसरली. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी पोहोचल्या असत्या तर परिस्थिती वर नियंत्रण मिळवता आले असते, असे पाल हॉटेलमध्ये जेवण करत असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका कॉन्स्टेबलने सांगितले. अग्निशमन दलाने आगीच्या घटनेनंतर तब्बल ४० मिनिटानंतर आपले कार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत आगीने रुद्र रुप धारण केले, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
संबंधित बातम्या