MVA Maha Morcha: महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा; राऊतांचा भाजप-शिंदे गटाला इशारा
Maha Vikas Aaghadi Maha Morcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात येणार आहे. यात मविआतील दिग्गज नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
Maha Vikas Aaghadi Maha Morcha Mumbai Live Updates : महापुरुषांच्या अपमानाविरोधात आज महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. सत्ताधारी भाजपसह शिंदे गटाचे नेते सातत्यानं वादग्रस्त वक्तव्ये करत असतानाही शिंदे-फडणवीस सरकारकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात असल्यानं त्याविरोधात मविआचे नेते आक्रमक झाले आहेत. मविआच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महापुरुषांच्या अपमानाविरोधात महाराष्ट्रातील जनता वाघाच्या छातीनं आणि सिंहाच्या हिंमतीनं सहभागी होणार आहे. महाराष्ट्रप्रेमींच्या या मोर्चात आडवे याल तर याद राखा, असा इशारा संजय राऊतांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपसह शिंदे गटाला दिला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र दिल्लीश्वरांच्या दावणीला बांधला- राऊत
महाराष्ट्राच्या जनतेला दिल्लीचे गुलाम बनवण्याचा सत्ताधाऱ्यांचा इरादा आहे. महाराष्ट्राला विकून त्यांना दिल्लीच्या चरणी खोके अर्पण करायचे आहेत, त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. महाराष्ट्रातील हे घटनाबाह्य सरकार राज्याच्या अब्रूचे धिंडवडे काढत असून त्यांचे धिंडवडे रोखण्यासाठीच महाराष्ट्रप्रेमींचा अतिविराट मोर्चा आज निघणार असल्याचं सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.
मविआच्या मोर्चात राज्यातील ११ कोटी जनतेच्या भावनांचा उद्रेक दिसून येणार आहे. ग्रामीण भागातील अनेक लोक मोठ्या संख्येनं मुंबईत येत असून महाराष्ट्र मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही हे दाखविणारा आणि राज्याचा स्वाभिमान काय आहे, हे या मोर्चातून सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ, असंही राऊत म्हणाले.
वाकड्या शेपटीचं सरकार दिल्लीचे गुलाम- राऊत
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, कर्नाटकातील मराठीभाषिक जनतेवर अन्यायाचा नवा वरवंटा फिरवला गेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन्ही राज्याच्या प्रमुखांना केवळ १५ मिनिटांची वेळ दिली. त्यातून कोणता तोडगा निघणार आहे?, काहीही झाले तरी कर्नाटकचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार आहे. कारण महाराष्ट्रातही एक वाकड्या शेपटीचं बेकायदा सरकार सत्तेवर आलं असून तेही दिल्लीचे गुलाम असल्याची टीका संजय राऊतांनी भाजप-शिंदे गटावर केली आहे.