Rain Updates : जायकवाडी आणि उजनी फुल्ल, विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Rain Updates In Maharashtra : गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळं आता जायकवाडी आणि उजनी धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
Rain Updates In Maharashtra : गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळं आता अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यातच आता पाण्याची आवक वाढल्यानं सोलापूर जिल्ह्यातील उजनी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. उजनी धरणातून एक लाख क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे तर जायकवाडी धरणातून दीड लाख क्यूसेक वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. त्यामुळं आता संभावित पूरस्थिती लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
गेल्या दहा दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं उजनी आणि जायकवाडी धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जायकवाडी धरणातून या वर्षी पहिल्यांदाच दीड लाख क्यूसेक वेगानं पाणी सोडलं जाणार असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यानं नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पहिल्यांदाच जायकवाडीचे संपूर्ण दरवाजे उघडणार...
मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. त्यामुळं आता या वर्षी पहिल्यांदाच धरणाचे संपूर्ण २७ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. मध्य महाराष्ट्राशिवाय राज्यातील विदर्भ, कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळं सातत्यानं होणाऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं वाया गेली असून त्यांच्यावर तिबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.