Graduate Election : कुठलेही देव आणि महापुरुष बॅचलर नव्हते; चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य
Chandrakant Patil : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म वाचवला नाही तर सर्वांची सुंता झाली असती, असंही उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
Chandrakant Patil Controversial Statement : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर चर्चेत आलेले उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता थेट देवीदेवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याची घटना समोर आली आहे. कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर नव्हते, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त युवा संवाद कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं आता त्यांच्यावर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पुण्यातील कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, व्यक्तीला संसार करून सगळं करता येतं. हिरवं किंवा निळं रक्त असलेला जगात एकही माणूस नाही. ईश्वरानं कुणासोबत कोणताही भेदभाव केला नाही. त्यामुळं कोणतेही देव किंवा महापुरुष हे बॅचलर नाहीत. असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. हिंदू हा एक धर्म नसून तो एक विचार आहे. हिंदू राजांनी कधीही कुणावर आक्रमण केलेलं नाही. परंतु इतर धर्मातील लोकांनी मात्र अनेक प्रदेशांवर हल्ले केल्याचंही उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
हिंदू हा शब्द गुणवाचक आहे. तो पूजेशी जोडला गेलेला नाही, त्यामुळं कुणाला मंदिरात तर कुणाला मस्जिदमध्ये प्रार्थनेसाठी जायला आवडत असेल तर त्यांनी जायलाच हवं, त्याला आपला विरोध नाही. भारतावर अनेक लोकांनी राज्यकर्त्यांनी आक्रमण केलं. त्यावेळी अनेक मुस्लिम लोक भारतात आले. इतकंच नाही तर इंग्रजांसह डच यांनीही भारतावर आक्रमण केलं. त्यामुळं आपल्याला काही फरक पडला का? हिंदू धर्म बुडाला का?, औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला परंतु त्यांनी धर्म सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म वाचवला नाही तर आतापर्यंत सर्वांची सुंता झाली असती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.