वारंवार घर सोडून जात असल्यामुळं वडिलांकडून मुलीची हत्या; धक्कादायक घटनेमुळं नाशिक हादरलं
Nashik Murder Case : ज्योतीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळल्यानं ती वारंवार घर सोडून जात होती. त्यामुळं संतापलेल्या पित्यानं आपल्याच लेकीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Murder Case In Nashik : एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्यामुळं मुलगी वारंवार घर सोडून पळून जात असल्याच्या कारणावरून जन्मदात्या पित्यानंच आपल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ज्योती भारती असं मृत तरुणीचं नाव असून रामकिशोर भारती असं आरोपीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती भारती या तरुणीचं नाशिक शहरातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळं ती अनेकदा घर सोडून प्रियकराकडे राहत होती. सुरुवातीला ज्योतीला तिच्या कुटुंबियांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्योतीनं प्रियकराकडेच राहण्याचा हट्ट धरला. त्यामुळं संतापलेल्या ज्योतीच्या वडिलांनी घरातच ज्योतीला ओढणीनं गळफास देऊन हत्या केली. शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली आहे. प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रामकिशोर भारतीला अटक केली असून तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
परिसरातील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर ज्योती अनेकदा घरच्यांशी वाद घालून प्रियकराकडे रहायला जात होती. त्यानंतर वडिलांनी ज्योतीची समजूत घालून तिला घरी आणलं होतं. परंतु ती पुन्हा प्रियकराकडे जाण्याच्या तयारीत असतानाच वडिलांनीच आपल्या लेकीची हत्या केल्याच्या घटनेमुळं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला अटक करून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.