Raj Thackeray in Parli : राज ठाकरे यांना मोठा दिलासा! अजामीनपात्र अटक वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट परळी कोर्टानं रद्द केलं आहे.
Parli court quashes warrant against Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. २००८ मधील एका प्रकरणात राज ठाकरे यांना बजावण्यात आलेला अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टानं रद्द केलं आहे.
राज ठाकरे यांनी २००८ साली एक चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. या अटकेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील धर्मापुरी इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी राज ठाकरेंवर चिथावणीखोर भाषणाचा व मनसे (MNS) कार्यकर्त्यांवर तोडफीडचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळी कोर्टानं सुनावणीला हजर राहण्यासाठी राज यांना दोनदा वॉरंट बजावलं होतं. मात्र, ते हजर राहिले नाहीत. त्यामुळं कोर्टानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं होतं.
वॉरंट निघताच राज ठाकरे हे आज (१८ जानेवारी) सकाळीच परळी कोर्टात हजर राहण्यासाठी पोहोचले. राज यांच्या प्रकरणातील सुनावणी अवघ्या पाच ते सात मिनिटांत पूर्ण झाली. करोनाचा काळ आणि आजारपणामुळं राज ठाकरे न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. त्यानंतर राज यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावून त्यांच्या विरोधातील वॉरंट न्यायालयानं रद्दबातल ठरवलं.
गर्दी, घोषणाबाजी आणि न्यायाधीशांचा संताप
राज ठाकरे हे कोर्टात हजर राहण्यासाठी येणार असल्याच्या वृत्तानंतर त्यांना पाहण्यासाठी परळीतील कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. राज ठाकरे येताच जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. 'राज ठाकरे झिंदाबाद…'च्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळं प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळं न्यायाधीशांनी संताप व्यक्त केला.
विभाग