Sujay Vikhe : काँग्रेसमध्ये भूकंप होणार; सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर सुजय विखे यांचा दावा
Congress vs BJP In Maharashtra : ठाकरे गटातील नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत, परंतु आता येत्या काळात काँग्रेसमध्येही मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य भाजप खासदार सुजय विखेंनी केलं आहे.
Sujay Vikhe On Congress : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं आता काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. भाजपनंही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याची तयारी सुरू केलेली असतानाच आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळं राजकीय गोटात खळबळ उडाली असून काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.
माध्यमांशी बोलताना भाजप खासदार सुजय विखे म्हणाले की, महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. परंतु आता भविष्यकाळात काँग्रेसमध्येही मोठा राजकीय भूकंप होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसमधील काही ठराविक लोकच मलाई खात होते. मविआच्या सत्ताकाळात जशी अस्वस्थता शिवसेनेमध्ये होती, तशीच आता काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे. त्यामुळं काँग्रेसचे अनेक नेते निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं खळबळजनक वक्तव्य सुजय विखे यांनी केलं आहे. त्यामुळं आता काँग्रेसमधील काही बडे नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
काँग्रेस पक्षात प्रत्येक नेत्याला आपली खुर्ची संभाळायची आहे. हेच काँग्रेसचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. अनेक जेष्ठ नेत्यांनी सत्तेत असतानाही पक्षाला मोठं करण्यासाठी काहीही केलेलं नाही. नव्या पिढीला वारंवार काँग्रेसमध्ये वारंवार नाकारलं जात असून त्यामुळं अनेक काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. त्यामुळं आता येत्या काळात काँग्रेसमध्ये राहुल गांधी हे एकटेच तरुण राहणार असल्याचंही सुजय विखे म्हणाले.