भाजपकडून समाजात फूट पाडण्याचं काम सुरू: मल्लिकार्जुन खर्गे
भारतीय जनता पक्ष समाजात ध्रुवीकरण निर्माण करत असून तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केला.
भारतीय जनता पक्ष समाजात ध्रुवीकरण निर्माण करत असून तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केला. काँग्रेस पक्ष देशात सातत्याने धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करत असल्याचं खार्गे यांनी सांगितलं. कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी राज्यसभा खासदार अविनाश पांडे यांच्या मुलाच्या लग्नात उपस्थित राहण्यासाठी खर्गे आज नागपुरात दाखल झाले. यावेळी नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यास देशात तातडीने जात जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग न्यूज
यावेळी बोलताना खर्गे म्हणाले, ‘बिहारमध्ये अलीकडे करण्यात आलेल्या जात सर्वेक्षणात अत्यंत मागास वर्ग (EBCs) आणि इतर मागास वर्ग (OBCs) मिळून राज्याच्या एकूण १३ कोटी लोकसंख्येपैकी जवळजवळ ६३ टक्के असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ईबीसी आणि ओबीसी हा सर्वात मोठा जात समूह बनला आहे.’ असं खर्गे यांनी सांगितलं. 'सत्तेत आल्यानंतर देशात जातनिहाय जनगणना करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचं खर्गे म्हणाले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत खर्गे म्हणाले, 'कॉंग्रेस आणि भाजपच्या दृष्टिकोनात फरक आहे. भाजप धार्मिक फूट पाडून तुष्टीकरण करण्याचं राजकारण करतात तर आम्ही धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करतो, असं ते म्हणाले.
राहुल गांधी थेट निवडणूक आयोगाला उत्तर देतील
राजस्थानमध्ये एका निवडणूक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘पनौती’ म्हणून उल्लेख केल्याबद्दल भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याबद्दल पत्रकारांनी खर्गे यांना प्रश्न विचारला. दरम्यान, राहुल गांधी थेट निवडणूक आयोगाला उत्तर देतील, असं खर्गे म्हणाले.
नागपुरात लग्नाला नेत्यांची मांदियाळी
नागपूर शहरात अविनाश पांडे यांच्या मुलगा गौरांग पांडे यांच्या लग्नासाठी कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अनेक नेते उपस्थित होते. अविनाश पांडे हे राहुल गांधी यांच्या जवळचे नेते मानले जातात.