उद्धव ठाकरेंची आज बुलडाण्यात प्रचार सभा झाली. त्यात त्यांनी केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे वाभाडे काढले. शेतकरी दरवर्षी किमान एक लाख रुपयांचे खत विकत घेतो. त्यावर १८ टक्के जीएसटी लावली जाते. एक लाखाचं खत घेतलं तर जीएसटी १८ हजार होते, मात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. याचा अर्थ शेतकऱ्याचे १२ हजार रुपये नरेंद्र मोदींच्या खिशात जातात.
शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून सरकार १२ हजार हिसकावून घेते आणि शेतकऱ्याला तुटपुंजे ६ हजार रुपये देतात. अशा माणसाचा तुम्ही पुन्हा सन्मान करणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी जनतेला केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन कोणी दिले होते. तुमचे उत्पन्न दुप्पट झाले का? मात्र निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकारने केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदीजी याच शिवसैनिकांनी तुम्हाला दोनदा पंतप्रधान करण्यासाठी जीवाचं रान केलं. अन् तुम्ही त्यांना नकली म्हणता? नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे काय? तुम्ही शिवरायांचा भगवा घेतलेल्या शिवसैनिकांना नकली म्हणताय, तुम्हाला महाराष्ट्राची जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघाती हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
उद्धव ठाकरे म्हणाले आज माझ्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आहे, कम्युनिस्ट आहेत. गेल्यावेळी आम्ही तुमच्यासोबत होतो. शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही महाराष्ट्रात फक्त दोन चार सभांसाठी आला होता. आता तुम्हाला महाराष्ट्रात वारंवार येऊन मतांची भीक मागावी लागत आहे. तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे संपला आहे, मग तुम्ही महाराष्ट्रात वारंवार येऊन माझ्यावर का बोलत आहात? तुम्ही माझा पक्ष फोडला, माझे वडील चोरले, पण तरीही जनता तुमच्यासोबत येत नाही. त्याला मी काय करू?
मोदीजी तुम्ही भ्रष्टाचारावर बोलता, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते तुमच्याकडे आले. एक ताईही तुमच्याकडे आल्या. त्यांनी तुम्हाला राखी बांधली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्याच पक्षाने केले. पण त्यांनी तुम्हाला राखी बांधली. ती राखी नाही. तुमच्या हातावरील राखी तुम्हाला सतत आरसा दाखवेल, असा टोला त्यांनी लगावला.
संबंधित बातम्या