Pashupati Paras quit NDA : महाराष्ट्रासह विविध राज्यांत छोट्या-छोट्या पक्षांची जमवाजमव करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये एका मित्रपक्षानं दणका दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी एकही जागा न दिल्यानं राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीचे नेते पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसंच, एनडीएला रामराम ठोकला आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांना आपल्या तंबूत आणल्यानंतर भाजपनं चिराग पासवान यांनाही सोबत घेतलं आहे. राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी आधीपासूनच भाजपसोबत होती. मात्र, नितीशकुमार आणि चिराग पासवान आल्यामुळं जागावाटपाचा पेच निर्माण झाला होता.
बिहारमध्ये नुकतंच एनडीएचं जागावाटप जाहीर करण्यात आलं. त्यात भाजपला १७, संयुक्त जनता दलाला १६, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला (रामविलास) ५, झीतनराम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहाच्या आरएलएमओला प्रत्येकी एक जागा देण्यात आली. मात्र, सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा दिली गेली नाही. त्यामुळं संतापलेल्या पारस यांनी राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात चिराग पासवान यांच्या पक्षाला ज्या ५ जागा देण्यात आल्या आहेत, त्यापैकी ४ जागा पशुपती पारस यांच्या पक्षाकडं होत्या. खरंतर लोकजनशक्ती पक्षानं २०१९ ची लोकसभा निवडणूक एनडीएसोबत लढवली होती. त्यावेळी पक्षात फूट नव्हती. मात्र यानंतर पक्षात दोन गट पडले. त्या निवडणुकीत एलजेपीचे ६ खासदार विजयी झाले. पशुपती पारस यांनी भाजपच्या छुप्या पाठिंब्यानं ५ खासदारांचा वेगळा गट स्थापन केला आणि केंद्रात मंत्रिपदही पटकावलं. मात्र यावेळी चित्र नेमकं उलट आहे. पुतण्यानं काकांवर मात केली आहे. पारस यांच्या पक्षाच्या सर्व जागा चिराग यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत.
एनडीएशी फारकत घेतलेले पशुपती पारस हे हाजीपूरमधून चिराग पासवान यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पारस यांची आरजेडी व काँग्रेसच्या आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याचं समजतं. ते महाआघाडीसोबत जाऊ शकतात असंही बोललं जात आहे. आमच्यासोबत अन्याय झाला आहे, अशी प्रतिक्रिया पशुपती पारस यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या