मराठी बातम्या  /  निवडणुका  /  satara lok sabha election : पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास तयार, म्हणाले…

satara lok sabha election : पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास तयार, म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 01, 2024 04:17 PM IST

Prithviraj Chavan on Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं लढण्याची तयारी पृथ्वीराज चव्हाण यांनी दर्शवली आहे.

पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास तयार, म्हणाले…
पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास तयार, म्हणाले… (HT_PRINT)

Satara Lok Sabha Election : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी काही नावांचा उल्लेख केला असला तरी ऐनवेळी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचं नाव पुढं आलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनीही ही निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपनं अबकी बार ४०० पारचा नारा दिला असला तरी लोकसभेची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार देण्याचा महायुती व महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ २०१९ पासून भलताच चर्चेत आला आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार हाच तिढा अद्याप सुटलेला नाही. तर, महाविकास आघाडीमध्ये मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं असला तरी उमेदवार कोण असेल यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अलीकडंच साताऱ्यात आलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचं नाव स्वत:ला बाजूला टाकलं आहे. त्यानंतर इथं बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने यांची नावं चर्चेत आहेत.

माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचंही नाव इथं चर्चेत आहे. या संदर्भात टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना चव्हाण यांनी यावर भाष्य केलं.

‘सातारा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं आहे. इथला उमेदवार ते ठरवणार आहेत. त्यांचा पक्ष जो उमेदवार राष्ट्रवादी देईल, त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही ताकदीनं काम करू असा शब्द आम्ही जाहीरपणे दिलाय,’ असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

जातीयवादी शक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी कटिबद्ध

'साताऱ्याच्या उमेदवारीबाबत काँग्रेसनं आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझं नाव हे मीडियानं चालवलं आहे. हा प्रश्न शरद पवार साहेबांनी सोडवायचा आहे. त्यांनी आदेश दिला तर माझी लढायची तयारी आहे. मात्र, निर्णय पवार साहेब घेतील. यशवतंराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत जातीयवादी शक्तीचा प्रवेश होऊ नये यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत, असं चव्हाण म्हणाले.

३७० खासदार त्यांना घटना बदलण्यासाठी हवेत!

राम मंदिरामुळं आपल्याला फायदा होईल असं भाजपला वाटलं होतं. पण तसं काही होणार नाही. कारण तो दोन ट्रस्टमधील वाद होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व झालं आहे. नरेंद्र मोदी यांचा त्याच्याशी काही संबंध नाही, असं चव्हाण म्हणाले. भाजपनं एकट्याच्या बळावर ३७० जागा जिंकण्याचं जे लक्ष्य ठेवलं आहे, ते घटना बदलण्यासाठी आहे. कारण घटना बदलण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची गरज आहे. ५४३ सदस्यांच्या संसदेत हा आकडा ३६० ते २७० असा आहे. त्यामुळं ही निवडणूक त्याच मुद्द्यावर होणार आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.

WhatsApp channel