Nitin Gadkari on his next portfolio : मोदी सरकारमधील सर्वाधिक लोकप्रिय व कार्यक्षम मंत्री अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अनेक राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार आल्यास कोणत्या खात्याचं मंत्रिपद घ्यायला आवडेल, यावरही त्यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.
नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. भाजपनं गडकरी यांना पहिल्या उमेदवार यादीत स्थान न दिल्यानं देशभरात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र, नंतर गडकरी यांना तिकीट मिळालं. सध्या ते जोमानं प्रचाराला लागले आहेत.
'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिपदाच्या कार्यकाळाबद्दल भाष्य केलं आहे. 'मी व्यावसायिक राजकारणी नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचे साधन आहे, असं माझं मत आहे. राजकारणात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असतं. विशेषत: शेती, जलसंधारण आणि जैवइंधन क्षेत्रात मी सामाजिक कार्य करत आहे. मी केवळ एक सामान्य व्यक्ती आहे, उच्च शिक्षित नाही. मी इतका हुशार नाही. परंतु मला विविध विद्यापीठांकडून सहा डी लिट प्रदान करण्यात आल्या आहेत. मंत्री म्हणून माझ्या कामाचं कौतुक झालंय. सर्व स्तरातून मला आदर आणि प्रेम मिळालं आहे. हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. जे मिळालं, त्याला मी पात्र नाही असं मला वाटतं. हे जनतेचं निखळ प्रेम आहे. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
निवडणुकीनंतर भाजप संविधान बदलू शकतं हा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. 'विरोधक खोटं बोलून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये आणि मूलभूत रचना बदलता येणार नाही. केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं तसं स्पष्ट नमूद केलं आहे. मात्र, खोटी मांडणी करून विरोधक मतं मिळवण्यासाठी अल्पसंख्याक, दलित आदींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं ते म्हणाले.
भाजप पुन्हा सत्तेत आल्यास कोणत्या खात्याचं काम करायला आवडेल यावरही गडकरी यांनी उत्तर दिलं. 'मी उद्याचा विचार करत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक निष्ठावान स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता आहे ही माझी ओळख आहे. तुम्ही माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री किंवा माजी खासदार असाल, पण पक्षाचा कार्यकर्ता हे पद कायम असते. जे मिळालं, त्यात मी समाधानी आहे. मी हिशेबी राजकारणी नाही. माझा सबका साथ सबका विकासावर विश्वास आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार कौतुकास्पद काम करत आहे. आम्ही तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू. माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली जाईल, ती मी स्वीकारेन, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या