Ratnagiri Sindhudurg lok Sabha Constituency : राज्यातील महायुतीमध्ये वादाचा विषय ठरलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. या मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उमेदवार असतील. त्यांचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं १३ वी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात एकमेव नाव असून ते नारायण राणे यांचं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.
शिवसेना-भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडं होता. तिथं विनायक राऊत हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळं शिंदे गटानं या मतदारसंघावर दावा केला होता. शिंदे गटाचे एक मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघातून इच्छुक होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यावरून काथ्याकूट सुरू होता. तर, भाजपनंही या मतदारसंघावर दावा ठोकला होता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी इथून प्रचाराला सुरुवातही केली होती. मात्र, त्यांचं नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं नव्हतं. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा आम्हीच लढवू, असा दावा शिंदे गटाचे उदय सामंत यांच्याकडून सातत्यानं केला जात होता. त्यामुळं पेच निर्माण झाला होता. अखेर त्यावर मार्ग निघाल्याचं दिसत आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मधल्या काळात नारायण राणे हे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे थोरले चिरंजीव नीलेश राणे या मतदारसंघातून निवडून आले होते. तो अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून इथं शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. गेल्या काही वर्षांत राजकीय समीकरणं बरीच बदलली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. तर, नारायण राणे भाजपवासी झाले आहेत.
यावेळी पुन्हा एकदा नीलेश राणे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असं बोललं जात होतं. मात्र, ४०० पारचं लक्ष्य ठेवलेल्या भाजपनं ताकदीनं निवडणुकीत उतरायचं ठरवलं आहे. देशभरात अनेक केंद्रीय मंत्र्यांना व राज्यसभा खासदारांना भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तोच कित्ता रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये गिरवण्यात आला आहे.
नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यापुढं आव्हान निर्माण झालं आहे. विनायक राऊत हे २०१४ आणि २०१९ असे दोन वेळा इथून निवडून आले आहेत. मात्र, भाजपची ताकद आता त्यांच्यासोबत नाही. शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळं दहा वर्षांतील कामांवरच त्यांची भिस्त असेल. शिवसेनेतील फुटीमुळं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा त्यांना कितपत मिळतो यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे.
संबंधित बातम्या