Rahul Gandhi : भाजप १५० च्या वर जागा जिंकणार नाही; राहुल गांधी यांना इतका विश्वास का?
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Rahul Gandhi : भाजप १५० च्या वर जागा जिंकणार नाही; राहुल गांधी यांना इतका विश्वास का?

Rahul Gandhi : भाजप १५० च्या वर जागा जिंकणार नाही; राहुल गांधी यांना इतका विश्वास का?

Apr 17, 2024 03:36 PM IST

Rahul Gandhi on Lok Sabha Election : चालू लोकसभा निवडणुकीत भाजप १५० च्या पुढं जागा जिंकू शकणार नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

भाजप १५० च्या वर जागा जिंकत नाही; राहुल गांधी यांना इतका विश्वास का?
भाजप १५० च्या वर जागा जिंकत नाही; राहुल गांधी यांना इतका विश्वास का?

Rahul Gandhi on Lok Sabha Election : ‘काही दिवसांपूर्वीपर्यंत मला वाटत होतं की भाजपला १८० च्या जवळपास जागा मिळतील, पण आता दीडशेचा आकडा गाठणं कठीण जाईल असं चित्र आहे,' असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केला.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये राहुल गांधी व समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राहुल गांधी यांनी यावेळी अनेक प्रश्नांना नेहमीच्या पद्धतीनं स्पष्ट उत्तरं दिली.

भाजपनं '४०० पार'चा दावा केल्याची आठवण त्यांना पत्रकारांनी करून दिली. राहुल यांनी या दाव्याची खिल्ली उडवली. ‘देशातील प्रत्येक राज्यात इंडिया आघाडी दिवसेंदिवस अधिक प्रभावी होतेय. इंडिया आघाडीची सुप्त लाट आहे अशी माहिती आहे. उत्तर प्रदेशातील आघाडी अत्यंत शक्तिशाली आहे,’ असा दावाही त्यांनी केला.

नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा

इलेक्टोरल बाँड्स योजनेवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी यांनी एएनआयला मुलाखत दिली. ही मुलाखत मॅनेज होती, पण ती फ्लॉप ठरली, असा दावा राहुल यांनी केला. इलेक्टोरल बाँड्स ही योजना पारदर्शकता वाढवण्यासाठी, राजकारण स्वच्छ करण्यासाठी आणली होती असं मोदी म्हणाले. हे खरं असेल तर सुप्रीम कोर्टानं ही योजना रद्द का केली? पारदर्शकतेसाठी ही योजना आणली होती तर ज्या कंपन्यांनी भाजपला पैसे दिले, त्यांची नावं आणि पैसे दिल्याची तारीख का लपवली गेली,' असा रोकडा सवाल राहुल गांधी यांनी केला.

अमेठीतून निवडणूक लढणार का?

वायनाड बरोबरच अमेठीमधूनही निवडणूक लढणार का या प्रश्नावरही राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. अमेठीमधून निवडणूक कोण लढणार याचा निर्णय पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती घेईल. ही समिती आणि पक्षाचे अध्यक्ष मला जो आदेश देतील, त्याचं पालन मी करेन, असं राहुल गांधी म्हणाले.

एका झटक्यात गरिबी हटेल असं नाही!

एका झटक्यात गरिबी हटवण्याचा दावा राहुल गांधी यांनी एका सभेत केला होता. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी टीका केली होती. त्या टीकेला राहुल यांनी उत्तर दिलं. 'गरिबी एका झटक्यात संपवण्याबाबत कोणीही बोललं नाही. मात्र आमच्याकडं एक सूत्र आहे, ज्या आधारे देशातील गरिबी आणि विषमता दूर करता येऊ शकते. पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व संपत्ती २२ ते २५ लोकांमध्येच वाटली आहे. ही विषमता दूर करून प्रत्येकाचा सहभाग आम्हाला वाढवायचा आहे. त्यातून गरिबी आपोआप संपेल. या उद्देशानंच आम्ही जात जनगणनेची मागणी करत आहोत, असं राहुल गांधी म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या