भारतात ५ ऑक्टोबरपासून क्रिकेट वर्ल्डकप सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणादेखील केली आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी कॅंडी येथील अर्ल्स रिजन्सी येथे या संघाची घोषणा केली. या संघात केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश केला आहे. सोबतच संघात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनीही जागा मिळवली आहे तर या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांत तीनदा संजू सॅमसनला वर्ल्डकप संघातून वगळण्यात आले आहे. गेल्यावर्षी च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून त्याच्यापेक्षा ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकला प्राधान्य दिले. आणि आता १० महिन्यांनंतरही काहीही बदलले नाही. आता संजूऐवजी इशान आणि राहुलला प्राधान्य देण्यात आले.
संघातील उर्वरित जागा या आधीच फिक्स होत्या. रोहित संघाचे नेतृत्व करेल आणि त्यात विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि शुभमन गिल या स्टार पॉवरचा समावेश असेल. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या सर्वांनी आपली जागा निश्चित केली आहे, तर मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला खालच्या फळी मजबूत करण्याच्या क्षमतेमुळे प्राधान्य देण्यात आले. दरम्यान, या वर्ल्डकप संघात युझवेंद्र चहलला वगळण्यात आले. त्याच्याऐवजी कुलदीप यादव आणि अक्षर पटेलला संधी मिळाली.
प्रश्न- वर्ल्डकप २०२३ मध्ये किती संघ सहभागी होत आहेत?
उत्तर- वर्ल्डकप २०२३ मध्ये १० संघ सहभागी होत आहेत
प्रश्न- वर्ल्डकप २०२३ साठी भारतीय संघाचे नेतृत्व कोणाच्या हाती आहे?
उत्तर- वर्ल्डकप २०२३ साठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.
प्रश्न- वर्ल्डकप २०२३ मधील सर्वात मजबूत संघ कोणते?
उत्तर- वर्ल्डकप २०२३ मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ सर्वात संतुलित दिसत आहेत.
प्रश्न- वनडे वर्ल्डकपमध्ये किती सामने खेळले जातील?
उत्तर- विश्वचषकात १० ठिकाणी बाद फेरीसह एकूण ४८ सामने होतील.
प्रश्न- आतापर्यंत कोण कोणत्या संघांनी विश्वचषक जिंकला आहे?
ऑस्ट्रेलियाने ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे, त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एकवेळा वर्ल्डकप ट्रॉफी उचलली आहे.