Rohit Sharma Ajit Agarkar Press Conference : आगामी टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर झाला आहे. बीसीसीआयने एकूण १५ खेळाडूंची निवड केली आहे. एवढेच नाही तर ४ खेळाडू राखीव म्हणून संघासोबत जाणार आहेत.
टी-20 वर्ल्डकपच्या संघ निवडीनंतर आज (२ मे) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
वर्ल्डकप संघाची निवड झाली, त्यावेळी रिंकू सिंग आणि केएल राहुल यांची निवड का झाली नाही? असे प्रश्न उपस्थित झाले होते. पण आता या प्रश्नांची उत्तरे कर्णधार रोहित शर्माने दिली आहेत.
बीसीसीआयने विश्वचषक संघात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे. याशिवाय १५ खेळाडूंमध्ये रिंकू सिंगची निवड न झाल्याने सोशल मीडियावर लोकांनी बीसीसीआयवर टीका करण्यास सुरुवात केली. केएल राहुलने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १० सामन्यांमध्ये ४० पेक्षा जास्त सरासरीने ४०६ धावा केल्या आहेत.
तर रिंकू सिंगने गेल्या वर्षी टीम इंडियासाठी पदार्पण केल्यानंतर भारतीय संघासाठी ८९ च्या सरासरीने फलंदाजी केली आहे.
केएल राहुलची निवड न झाल्याबद्दल मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, "केएल राहुल हा उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु आम्हाला मधल्या षटकांमध्ये वेगाने फलंदाजी करू शकेल अशा फलंदाजाची गरज होती. राहुल सध्या आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी सलामीला खेळत आहे.
संघात सध्या कोणत्या जाग रिक्त आहेत, यावरू हा निर्णय घेण्यात आला आहे आणि आम्हाला असे वाटले की ऋषभ पंत आणि संजू सॅमसन मधल्या फळीत वेगाने फलंदाजी करून जबाबदारी सांभाळू शकतात.
रिंकू सिंगबद्दल आगरकर म्हणाले, "आम्हाला रिंकू सिंगबाबत खूप विचार करावा लागला आणि कदाचित आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. त्याने काहीही चुकीचे केलेले नाही आणि शुभमन गिलनेही काही चुकीचे केलेले नाही. हे सर्व टीम कॉम्बिनेशवर आधारित आहे.
आता आमच्याकडे २ मनगटी फिरकी गोलंदाज आहेत, त्यामुळे याला दुर्दैव म्हणता येईल. रिंकूला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे, यावरून तो १५ खेळाडूंच्या संघात स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ होता. शेवटी आम्ही फक्त १५ खेळाडूच निवडू शकलो.”