Loksabha Mosoon Session : मणिपूरच्या घटनेवरून विरोधक आक्रमक, मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस
opposition attacks Modi govt over Manipur Violence : मणिपुरच्या घटनेवर संसदेबाहेर बोलणारे पंतप्रधान नरेंद्रम मोदी सभागृहात का बोलत नाहीत?, असा सवाल विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे.
no confidence motion against modi govt in lok sabha : गेल्या दोन महिन्यांपासून मणिपुरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून संसदेत विरोधी पक्षांची आघाडी 'इंडिया' चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मणिपुरमध्ये प्रश्नावर भूमिका मांडण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे संसदेत सरकारची बाजू मांडत असताना देखील विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अविश्वास ठरावावरील नोटीस स्वीकारली असून ठराव मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मणिपुरमधील हिंसाचाराच्या घटनांवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पीएम मोदींना संसदेत भूमिका मांडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपने विरोधक कामकाजात अडथळा आणत असल्याचा आरोप केला आहे. अविश्वास ठरावाची नोटीस दिल्यानंतर बोलताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की, भाजपचे लोकसभेत सर्वाधिक खासदार आहे. परंतु संसदेत अविश्वास ठराव मांडणं हे मोदींकडून मणिपुरच्या घटनेवर प्रतिक्रिया घेण्याचा एकमेव मार्ग असल्याचं गोगोई यांनी म्हटलं आहे. याशिवाय संसदेत सर्व विरोधी पक्ष मणिपुरमधील प्रकरणावर एकत्र भूमिका मांडत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अविश्वास ठराव कुणाच्या बाजूने जाणार?
लोकसभेत केवळ भाजपच्या खासदारांची संख्या तीनशेपार आहे. त्यामुळं विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाचा मोदी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. विरोधकांनी ठराव मांडला तरी निकाल मात्र सरकारच्याच बाजूने लागणार आहे. परंतु तरीही विरोधी पक्षांकडून अविश्वास ठराव मांडण्यात आल्यामुळं राजकीय जाणकारांच्या भूवया उंचावल्या आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत यूपीएचं विसर्जन करत 'इंडिया' आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळं मणिपुरच्या प्रश्नावर पहिल्यांदाच संसदेत विरोधी पक्ष एकवटल्याचं पाहायला मिळत आहे.