नवरीची कमाल! मांडवातून पळालेल्या नवरदेवाला २० किलोमीटर पाठलाग करून पकडले
Bareilly Marriage News : मांडवातून पळालेल्या नवरदेवाला नवरीनं तब्बल २० किलोमीटर पाठलाग करून पकडल्याची नाट्यमय घटना समोर आली आहे.
Bareilly Marriage News : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना घडली आहे. लग्नाच्या मांडवातून पळालेल्या एका नवरदेवाला नवरीनं तब्बल २० किलोमीटर पाठलाग करून पकडल्याचं समोर आलं आहे. नवरीच्या या जिद्दीपुढं हरलेल्या या नवरोबाला अखेर वरमाला घालावीच लागली.
ट्रेंडिंग न्यूज
बरेली येथील जुन्या शहर भागातील तरुणी आणि बिसौली बदायुन येथील मुलामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळला. नातेवाईकांनी काही हालचाल करण्याआधीच मुलगा आणि मुलीनं मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. नंतर मुलीचे कुटुंबीयही तयार झाले. सोमवारी मुलीच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत बरेलीच्या रामनगर रोडवर असलेल्या भूतेश्वरनाथ मंदिरात दोघांच्या लग्नाची तयारी करण्यात आली होती, मात्र सर्व तयारी झाल्यानंतर मुलाचा मूड अचानक बदलला आणि त्यानं तिथून पळ काढला.
नववधूचा वेश परिधान करून मंडपात पोहोचलेल्या मुलीला हे कळताच तिला धक्काच बसला. आपल्या कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिल्यानंतर हा प्रकार घडल्यानं ती अस्वस्थ झाली. काहीही करून कुटुंबीयांना खाली मान घालायला लावणार नाही, असा निर्धार तिनं मनाशी केला. धक्क्यातून सावरत नववधूच्या वेषातच ती नवरदेव मुलाला शोधण्यासाठी बाहेर पडली. नवरदेव कुठं जाऊ शकतो याचा तिला पुसटसा अंदाज होता. त्यावरूनच तिनं त्याचा पाठलाग सुरू केला. सुमारे २० किलोमीटरचा पाठलाग केल्यानंतर तिचा अंदाज खरा ठरला. मुलगा एका बसमधून जात असलेला तिला दिसला. तिनं लगेचच बस थांबवली आणि मध्येच त्याला उतरण्यास भाग पाडलं. मुलगा बसमधून उतरल्यावर ती तडक त्याला मांडवात घेऊन आली आणि लग्न लावून घेतलं.
का पळाला होता मुलगा?
आईला आणण्यासाठी बिसौली बदायुन इथं जात असल्याचं सांगून नवरदेव मुलानं पळ काढला. पण मुलीसमोर त्याचं काहीएक चाललं नाही. त्याला मंडपात परत यावंच लागलं. कालांतरानं मुलाच्या कुटुंबीयांनीही या लग्नाला होकार दिली. आणि लग्न सुरळीत पार पडलं.
विभाग