maharashtra Award event : अमित शहांच्या सोयीनं कार्यक्रम झाला असेल तर कोण चौकशी करणार? - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Maharashtra Bhushan award event tragedy : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या ११ श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला, तर काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे. काल रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट घेत रुग्णांची चौकशी केली.
Uddhav Thackeray, Ajit Pawar visits MGM Hospital : काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची वेळ खराब होती आणि व्यवस्थापन चुकीचे होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोयीनुसार कार्यक्रम दुपारचा झाला असेल, तर कोण चौकशी करणार? असा प्रश्न उपस्थित करत अमित शहा यांना कार्यक्रमासाठी दुपारची वेळ हवी असेल तर ते दुर्दैव आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर ही घटना म्हणजे कार्यक्रमावर काळा डाग आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
ट्रेंडिंग न्यूज
उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी मध्यरात्रीनंतर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयाला भेट दिली. रविवारी नागपुरात वज्रमुठ सभेनंतर एमव्हीए नेते मध्यरात्रीनंतर रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांनी आजारी असेलल्या रुग्णांची भेट घेत त्यांची चौकशी केली. तसेच शासनाच्या चुकीच्या नियोजनावर टीका देखील त्यांनी केली.
उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले, या कार्यक्रमासाठी निवडलेली वेळ ही वेळ खराब होती. कार्यक्रमाचे नियोजन देखील चुकीचे होते. व्यवस्थापनात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. हा कार्यक्रम जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोयीनुसार कार्यक्रम दुपारचा झाला असेल, तर या प्रकरणाची चौकशी कोण करणार ? अमित शहा यांना कार्यक्रमासाठी दुपारची वेळ हवी असेल तर ते दुर्दैव आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, कार्यक्रमाची वेळ खराब होती. ते म्हणाले की सहभागींपैकी दोन व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. जे झाले ते निष्काळजीपणामुळे झाले. ही घटना म्हणजे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावर काळा डाग आहे. कार्यक्रम संध्याकाळी झाला असता तर हे झाले नसते, असे पवार म्हणाले.
रविवारी खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.