मराठवाड्यासह विदर्भ थंडीनं गारठला, परभणीत निचांकी तापमानाची नोंद; मुंबई-पुण्याची स्थिती काय?
Maharashtra Weather Updates : उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान खालावलं आहे.
Mumbai-Pune Weather Updates : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेली थंडी अखेर आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा परतली आहे. वातावरणात सातत्यानं बदल होत असल्यानं राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानातील बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात कडाक्याची थंडी पडत असून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्यानं थंडी वाढत असल्यानं शेकोट्या पेटल्या आहेत. याशिवाय तामिळनाडूत आलेल्या चक्रिवादळामुळं त्याचा मुंबई आणि पुण्याच्या हवामानावरही प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, हिमालयातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळं उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचं प्रमाण वाढलं आहे. औरंगाबाद, जालना बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील तापमान खालावलं असून परभणीत निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाण्यातही तापमान कमी झालं आहे. विदर्भातील गोंदियात ८.८ तर परभणीत ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई-पुण्याची स्थिती काय आहे?
बंगालच्या उपसागरात आलेल्या मंदोस या चक्रिवादळामुळं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या १२ ते १४ डिसेंबरच्या दरम्यान कोकण, मुंबई, पुण्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं सध्या असलेलं तापमान आणखी खालावण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.