Kashid Beach : सहलीसाठी कोकणात आला अन् भरदिवसा समुद्रात बुडाला; वडिलांच्या डोळ्यांदेखत मुलाचा मृत्यू
Kashid Beach Raigad : शैक्षणिक सहलीसाठी कोकणात आलेल्या विद्यार्थ्याचा काशिद बीचवर समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Kashid Beach Raigad Incident : शैक्षणिक सहलीसाठी शिक्षकांसह अलीबागला आलेल्या एका विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील साने गुरुजी विद्यालयाची सहल रायगडमध्ये आली होती, त्यावेळी अनेक विद्यार्थी काशिद येथील समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना त्यापैकी चार विद्यार्थी समुद्रातील पाण्यात बुडाले. त्यानंतर किनाऱ्यावरील काही लोकांनी तातडीनं पाण्यात उड्या मारून विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु चारपैकी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. यावेळी एका विद्यार्थ्याचे वडील महाविद्यालयात शिपाई म्हणून काम करत होते. मुलगा सहलीवर जात असल्यानं तेही सहलीसाठी आले होते. परंतु ऐन आनंदाच्या क्षणी त्यांच्यावर काळानं घाला घातला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील साने गुरुजी विद्यालयाची सहल अलीबागला आली होती, त्यावेळी मुलगा प्रणय कदम सहलीसाठी हट्ट धरत असल्यामुळं त्याच शाळेत शिपायाचं काम करत असलेल्या त्याच्या वडिलांनाही सहलीसाठी येण्याचा निर्णय घेतला. परंतु काशिद बीचवर आल्यानंतर समुद्रकिनारी फिरत असलेला प्रणय पाण्यात बुडाला. त्यामुळं त्याच्या वडिलांना सर्वांदेखत सर्वदेखत रडू कोसळलं. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर फिरत असलेल्या तरुणांनी प्रणयला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानं कन्नडमधील कदम कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
औरंगाबादेतून रायगडमध्ये ८८ विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आली होती. जंजिरा किल्ला पाहून झाल्यानंतर सर्वजण काशिद बीच पाहण्यासाठी अलीबागला आले होते. भरदिवसा ही घटना घडली असताना किनाऱ्यावर लाइफगार्ड आणि स्पोर्ट्स ऑपरेटर उपस्थित नसल्यामुळं आता किनाऱ्यावर फिरणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.