Snake Eggs at Navi Mumbai Construction Site : नवी मुंबईतील उलवे इथं एका बांधकामाच्या ठिकाणी सापाची ८१ अंडी सापडली आहेत. सर्पमित्र अक्षय डांगे यांनी ही अंडी गोळा करून ती उबवली. ही अंडी यशस्वीरित्या उबवली गेल्यानंतर जन्मास आलेल्या सर्पांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आलं आहे.
उलवे इथं बांधकाम साइटवर काम करत असताना कामगारांना जवळच्या अंगणात धामण जातीचा साप दिसला. बांधाकमामुळं होणाऱ्या त्रासामुळं बिनविषारी असलेला हा साप तिथून निघून गेला. मात्र खबरदाराची उपाय म्हणून कामगारांनी तातडीनं सर्पमित्र अक्षय डांगे (Akshay Dange) यांना बोलावून घेतले.
बांधकाम स्थळी येऊन पाहिलं असता अक्षय डांगे यांना तिथं सापाची अंडी दिसली. तब्बल ८१ अंडी होती. अंड्यांची स्थिती अतिशय नाजूक होती. त्यामुळं त्यांनी ही अंडी काळजीपूर्वक गोळा केले आणि कोकोपीटनं (नारळाच्या केसरांनी बनलेल्या वड्या) भरलेल्या बॉक्समध्ये ठेवले. ऑक्सिजन आत जाण्यासाठी डांगे यांनी बॉक्सला लहान छिद्र केलं. त्यानंतर डांगे यांनी २४ दिवस ३० अंश सेल्सिअस तापमान कायम ठेवलं. या काळजीपूर्वक उष्मायन प्रक्रियेमुळं सर्व अंडी यशस्वीरित्या उबवली गेली. त्यातून अनेक सापांचा जन्म झाला. या सापांना खाडीजवळील जंगलात सुरक्षित अधिवासात सोडण्यात आलं.
सापांची ८१ अंडी वाचवणारे अक्षय डांगे यांनी नागरिकांना एक छोटासा संदेश दिला आहे. तुम्हाला कोणताही साप आढळला तर त्याला इजा करू नका. साप वाचवा,' असं आवाहन त्यांनी केलं आहे.
सापांबद्दल जनसामान्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जगभरात सापांच्या २ हजारहून अधिक प्रजाती असल्याचं बोललं जातं. त्यापैकी ३४० प्रजाती भारतात आढळतात. त्यातील फक्त ६९ प्रजाती विषारी आहेत. मात्र, साप दिसला की तो विषारीच असणार आणि आपल्याला वाचायचं असेल तर त्याला मारावंच लागणार असं साधारण समजलं जातं. त्यातून लोक सापांना मारतात. त्यातून जीवसृष्टीचं व निसर्गचक्राचं अपरिमित नुकसान होतं, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. सर्पमित्र याबद्दल वेगवेगळ्या माध्यमांतून जनजागृती करताना दिसतात. उलवे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर अक्षय डांगे यांनी देखील याच अनुषंगानं लोकांना आवाहन केलं आहे.
संबंधित बातम्या