Jan Aakrosh Morcha : छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर?, शिवेंद्रराजे म्हणाले...
Shivendraraje Bhosale In Pune : छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला होता. त्यानतंर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Shivendraraje Bhosale On Ajit Pawar In Pune : लव्ह जिहाद, गो-हत्या आणि धर्मांतरबंदीच्या कायद्यासाठी पुण्यातील विविध हिंदू संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील दाखल झाले असून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते की धर्मवीर?, या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा केला होता. त्यानंतर भाजपनं पवारांच्या विधानावर आक्षेप घेत छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर असल्याचा दावा केला होता.
पुण्यातील हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभागी झाल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख धर्मवीर अशीच राहिलेली आहे. त्यामुळं आता यावर फार चर्चा होऊ नये, असं म्हणत शिवेंद्रराजे यांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांना टोला हाणला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदू समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ही भीती कमी करण्यासाठी आम्ही मोर्चा काढला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असल्यामुळं या मोर्चाची दखल घेतली जाईल, असंही शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी धर्माचं रक्षक व्हावं, असा मुद्दा होता. हिंदू जनआक्रोश मोर्चातून आम्हाला कुणालाही विरोध करायचा नाहीये. फक्त हिंदू धर्म जपण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचं शिवेंद्रराजे म्हणाले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिन हा बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, लव्ह जिहादसह धर्मांतराविरोधात कायदा करण्यात यावा, या मागण्यांसाठी पुण्यातील हिंदू संघटनांनी मोर्चा काढला आहे. याशिवाय गो-हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.