Mumbai Local: एका ३२ वर्षीय तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकलून दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत तरुणाला त्याचा उजवा हात गमवावा लागला असून पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
कुमार लालजी दिवाकर (वय, ३२) असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला चार मुले आहेत. दिवाकर हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. आठवडाभरापूर्वीच तो शहरात आला आणि उलवे येथील एका लॉन्ड्रीमध्ये त्याने नोकरी मिळवली होती. त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाकर २६ एप्रिल रोजी सुट्टीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नेरुळहून उरणकडे जाणाऱ्या गर्दीच्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.
नेरुळ स्थानकातील प्लॅटफॉर्मवरून गाडी निघत असताना दिवाकर गर्दीच्या डब्यात शिरला. मात्र, यामुळे चार प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी दिवाकरला मारहाण केली. दिवाकरने त्यांची माफी मागूनही त्याला मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांच्यातील एकाने दिवाकरवर चाकूने हल्ला केला आणि त्याला रेल्वेतून खाली ढकलले, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
दिवाकर रुळावर पडल्याने त्याच्या उजव्या हातावरून रेल्वे गेली. तसेच त्याचा पायही तुटला. तो रुळावर पडलेला पाहून रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याला वाशीतील एनएमएमसी रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्याला जेजे रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, दिवाकर यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्याला आपला उजवा हात गमवाला लागला आहे.
“दिवाकरचा प्राथमिक जबाब नोंदवून आम्ही तक्रार दाखल करून घेतली. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आरोपीची ओळख पटवण्यासाठी आम्ही त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवू. हे चारही आरोपी कोणत्या स्थानकातून ट्रेनमध्ये चढले? याबाबतही स्पष्टता हवी”, अशी माहिती पनवेलच्या जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी दिली.
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३२३ (स्वेच्छेने इजा पोहोचविणे), ३२४ (धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी स्वेच्छेने इजा पोहोचविणे), ३२६ (स्वेच्छेने गंभीर इजा करणे), ३४१ (चुकीच्या पद्धतीने रोखणे), ५०४ (जाणूनबुजून अपमान करणे आणि चिथावणी देणे) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.
जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये रेल्वेतून पडून ५९० प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर १२४१ प्रवासी जखमी झाले. नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत धुरात म्हणाले की, ही घटना गर्दीमुळे किंवा गुंडगिरीमुळे घडली असावी. गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याबरोबरच ट्रान्स हार्बर मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव दूर करण्याची गरज आहे. हा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या