
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जिवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी माझी सुपारी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, या आरोपांमुळं ते राजकीय विरोधकांच्या निशाण्यावरही आले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संजय राऊत यांना निर्बुद्ध म्हणून हिणवल्यानंतर आता मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी राऊत यांना खुलं पत्र लिहिलं आहे. यात देशपांडे यांनी राऊत यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मनाविरुद्ध घटना घडल्या की माणसाचा संयम ढळतो. निराशेचे झटके येतात आणि माणूस लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. ही लक्षणं तुमच्यात दिसत आहे. तुम्ही वेळीच सावध होऊन काळजी घ्यायला हवी, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. देशपांडे यांनी या पत्रातून शिवसेनेची सध्याची अवस्था, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
काय आहे संदीप देशपांडे यांच्या पत्रात?
आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र !
हे येडxx मला का पत्र लिहितंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या. मग हळूहळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling ) मनाला लावून घेतली आहे. ती पहिली आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार…पवार….असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या…नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा!
संबंधित बातम्या
