Maharashtra politics : ‘मविआ’मध्ये मोठी घडामोड, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, सव्वा तास खलबतं!
uddhav Thackeray meets sharad pawar : उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेण्यासाठी गेले होते,यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊतही होते. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. पवार व ठाकरेंमध्ये जवळपास सव्वा तास खलबतं झाली.
मुंबई – गौतम अदानीच्या जीपीसी चौकशीवर विरोधी पक्षांपेक्षी वेगळी भूमिका मांडून शरद पवार राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते. त्यानंतर त्यांनी मोदींच्या डिग्रीवरूनही विरोधकांना खडेबोल सुनावल्याने, महाआघाडीत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेण्यासाठी गेले होते, यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊतही होते. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. पवार व ठाकरेंमध्ये जवळपास सव्वा तास खलबतं झाली.
ट्रेंडिंग न्यूज
मागच्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतभिन्नता दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना महाआघाडीतील सहकारी पक्षांबरोबर चर्चा केली नसल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी आजच केलं होतं.
शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, अदानी चौकशी ते ईव्हीएमसारख्या काही मुद्यांवर मतभिन्नता दिसून आली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्यांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढूया या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. जे संविधानाच्या विरोधात आहेत त्यांच्या विरोधात आपण लढायचं. त्याशिवाय, राज्यात आणि केंद्रात देखील एकी कायम राहिली पाहिजे या मतावरही दोन्ही पक्ष ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अदानी प्रकरणामध्ये जेपीसीची गरज नसल्याचं विधान शरद पवार यांनी केलं,पण काँग्रेस आणि शिवसेनेनं जेपीसीची मागणी लाऊन धरली आहे. तसंच सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांनी राहुल गांधींसमोरच विरोधकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तसंच उद्धव ठाकरेंनीही या मुद्द्यावरून काँग्रेसला इशारा दिला होता. त्यानंतर अजित पवारांनी जनतेने मोदींना त्यांची डिग्री पाहून मते दिल्याचे वक्तव्य केल्याने महाआघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत होते.