मुलगा होत नाही म्हणून पत्नीचा गळा आवळून खून, अन् विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा केला बनाव
Murder of wife in Kolhapur : दोन मुलीच झाल्या वंशाला दिवा मुलगा होत नसल्याच्या रागातून एकाने पत्नीची गळा आवळून हत्या केली व विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा बनाव केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
Kolhapur crime news – मुलगा होत नाही म्हणून पत्नीशी वाद घालत तिचा दोरीने गळा आवळून खून केला व नातेवाईकांची सहानुभूती मिळवण्यासाठी विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा बनाव केला. ही घटना करवीर तालुक्यातील दोनवडे या गावात घडली. अश्विनी एकनाथ पाटील (वय २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शनिवारी पहाटे हा प्रकार घडला. अश्विनीच्या माहेरच्या लोकांनी पती एकनाथवर हत्येचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी व एकनाथ या दाम्पत्याला दोन मुली आहेत. मुलगा व्हावा यासाठी पती एकनाथ पत्नीसोबत सतत वाद घालत होता. त्याच्याकडून मुलाच्या हव्यासासाठी अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. एकनाथ पेंटींगची कामे करतो. शनिवारी पहाटेच्या सुमारास एकनाथने अश्विनीचा दोरीने गळा आवळून एकनाथने खून केला. यानंतर तिला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करून तिला विजेचा धक्का लागल्याचे सांगितले.
ट्रेंडिंग न्यूज
अश्विनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी अश्विनीचा पती एकनाथ यांनीच खून केल्याची तक्रार दिली तसेच शवविच्छेदन अहवालातही अश्विनीचा गळा आवळ्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. करवीर पोलिसांनी एकनाथला अटक केली असून करवीरचे पोलिस उपनिरीक्षक निवास पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.