Hasan Mushrif : आधी नवाब मलिक, आता मी, नंतर अस्लम शेख असं… ईडी कारवाईवर हसन मुश्रीफ यांना 'हा' संशय
Hasan Mushrif on ED Raids : ईडीनं केलेल्या छाप्याच्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Hasan Mushrif on ED Raids : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या व त्यांच्या नातलगांच्या कोल्हापुरातील मालमत्तांवर आज ईडीनं छापे टाकले. त्यामुळं हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. ईडीच्या या कारवाईवर बोलताना हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कोल्हापूरच्या बाहेर असलेल्या मुश्रीफ यांनी एक व्हिडिओ शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ यांच्यावरील छाप्याचे पडसाद त्यांचा मतदारसंघ असलेल्या कागलमध्ये उमटले आहेत. कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली आहे. मुश्रीफ यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. कागल बंद ठेवण्याचं आवाहन मागे घ्यावं व सरकारी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावं, असं त्यांनी म्हटलं आहे. कुठलीही दंगाधोपा किंवा कायदा-सुव्यवस्था अडचणीत येईल असं कुठलंही कृत्य माझ्यासाठी कुणी करू नये, अशी विनंतीही त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.
हेतू काय हे कळायला मार्ग नाही!
'याआधी दीड-दोन वर्षांपूर्वी असेच छापे माझ्या घरावर व कारखान्यांवर पडले होते. त्यावेळी सगळी माहिती केंद्रीय यंत्रणांनी घेतली होती. पुन्हा हा छापा का घातलाय माहीत नाही. ३० ते ३५ वर्षांचं माझं सार्वजनिक जीवन सर्वांसमोर आहे. पहिल्या छाप्यांतूनही काही निष्पन्न झालं नव्हतं. त्यामुळं आता कुठल्या हेतूनं छापा घातला कळायला मार्ग नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मी मीडियाशी बोलेनच. मात्र, तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
चार दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांना माहीत होतं!
माझ्यावर कारवाई होणार असल्याची माहिती कागलमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना होती, असा गौप्यस्फोट मुश्रीफ यांनी केला आहे. 'चारच दिवसांपूर्वी कागल तालुक्यातील भाजपच्या एका नेत्यानं दिल्लीत अनेक चकरा मारून माझ्यावर कारवाई करावी यासाठी प्रयत्न केले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना ईडी कारवाईची माहिती दिली होती. अशा प्रकारे नाउमेद करण्याचं काम जे चाललेलं आहे, ते अतिशय गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा प्रकारे कारवाया होणार असतील तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. आधी नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली. त्यानंतर माझ्यावर छापे पडतायत. आता किरीट सोमय्या म्हणतात, अस्लम शेख यांचा नंबर आहे. म्हणजे विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना टार्गेट करायचं ठरवलंय की काय, अशी शंका मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.
विभाग