Shinde Govt : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव; सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Cabinet Decision : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
Shinde-Fadnavis Govt Cabinet Meeting Today : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना आज शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून त्यात अनेक महत्त्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात २० हजार पोलिसांची भरती करणार असल्याचा निर्णय फडणवीसांच्या गृहविभागानं घेतला आहे. तर चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचं नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय ठाकरे सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेक देत शिंदे सरकारनं आज काही नव्या योजनांची घोषणा केली आहे.
कॅबिनेट बैठकीत काय निर्णय घेण्यात आलेत?
१. मराठवाडा आणि विदर्भातील विकास महामंडळांचं पुनर्गठन केलं जाणार.
२. यापुढे राज्यात फॉर्टिफाईड तांदळाचं दोन टप्प्यात वितरण केलं जाईल.
३. गृहविभागातील २० हजार पदांची भरती करण्याचा मोठा निर्णय.
४. ओबीसी प्रवर्गातल्या मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी राज्यातील विविध शहरांमध्ये ७२ हॉस्टेल्स उभारणार.
५. ओबीसी, विभक्त जाती, भटक्या जमाती आणि विभक्त मागास प्रवर्गातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार.
६. उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थांच्या शिष्यवृ्त्तीची रक्कम ५० हजारांपर्यंत वाढवली.
६. वणवा, प्राणी हल्ला, तस्कर किंवा शिकारींच्या हल्ल्यात ज्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा अथवा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभ देण्यात येणार.
७. वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयातील ग्रंथपाल आणि क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार.
8. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम (२०२१) मागे घेण्यात आला.
9. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं नामकरण बॅरिस्टर नाथ पै विमानतळ असं करण्यात येणार.
दरम्यान आज सकाळपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या वतीनं कोर्टात युक्तिवाद पूर्ण झाला आहे. याशिवाय एकनाथ शिंदे आणि शिंदे गट आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वतीनंही कोर्टात करण्यात आला असून आता निवडणूक आयोगाच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळं आता सुप्रीम कोर्ट राज्यातील सत्तासंघर्षावर आज काय निकाल देणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.