Ashish Shelar : मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच.. ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला करणार तडीपार - शेलार
आशिष शेलार (Ashishshelar यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदाची जबाबदारी देताच उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) डिवचलं आहे. मुंबई महापालिकेतून भ्रष्टाचारी शिवसेनेला तडीपार करणार असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत.
मुंबई - भाजपने महाराष्ट्रातील कार्यकारिणीत आज बदल केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आशिष शेलार (Ashish shelar) यांच्याकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद देऊन मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने मुंबईची धुरा शेलारांकडे सोपवली आहे. शेलार यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदाची जबाबदारी देताच उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) डिवचलं आहे. मुंबई महापालिकेतून भ्रष्टाचारी शिवसेनेला तडीपार करणार असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबईकरांसाठी आम्ही गेली दोन दशकभर ज्यांच्याबारोबर संघर्ष केला, त्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला तडीपार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. तसेच केंद्रीय भाजपाला मुंबईत जे काम अपेक्षित आहे ते करत यश संपादन करुन देण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यासाठी मुंबईतील भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मोठी टीम असून सगळे मिळून आम्ही आमचाच महापौर महाापालिकेत (mumbai mayor) बसवू, असेही आमदार अॅड आशिष शेलार (Ashish shelar )यांनी जाहीर केले.
मुंबईतील रखडलेला कोस्टल रोड, मेट्रोच्या आरेतील कारशेडला अडवणे, रस्त्यावर पडलेले खड्डे, संगणक खरेदीमध्ये भ्रष्टाचार, शालेय साहित्य देण्यात झालेला विलंब अशी अत्यंत भ्रष्ट व्यवस्था मुंबई महापालिकेत असून मुंबईकरांना यापासून सुटका हवी आहे. ज्यांनी आतापर्यंत ठराविक कंत्राटदरांना पोसले व कंत्राटदारांनी ज्यांना पोसले त्यांना महापालिकेतून तडीपार करण्याची गरज आहे. मुंबईकरांची ही इच्छा पूर्ण होईल, असेही त्यांनी म्हटले.
शेलार (Ashish shelar ) यांनी यापूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. त्यामुळं मुंबई भाजपवर त्यांची पकड आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपनं त्यांच्याच नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेची निवडणूक लढली होती. त्यात भाजपनं घवघवीत यश मिळवत सत्तेपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी शिवसेनेच्या खालोखाल भाजपला ८३ जागा मिळाल्या होत्या. ही संख्या केवळ दोनने कमी होती. त्याचवेळी महापालिका भाजपच्या हातात आली असती मात्र राज्यातील सत्तेमुळं भाजपला तडजोड करावी लागली होती. यावेळी कोणत्याही परिस्थितीत महापालिका सोडायची नाही असा निर्धार भाजपनं केला आहे. आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी पुन्हा निवड हा त्याच रणनीतीचा एक भाग मानला जात आहे. शिवसेना शेलार यांच्या राजकीय डावपेचांना कसं उत्तर देते, हे आता पाहावं लागणार आहे.