मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसैनिकांनी ठरवल्यास हे सगळे माजी होतील, बंडाचा इतिहास हेच सांगतो - शिवसेना

शिवसैनिकांनी ठरवल्यास हे सगळे माजी होतील, बंडाचा इतिहास हेच सांगतो - शिवसेना

Jun 23, 2022, 07:57 AM IST

    • सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केली असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सल्लाही दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फोटो - पीटीआय)

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केली असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सल्लाही दिला आहे.

    • सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केली असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सल्लाही दिला आहे.

Shiv Sena Saamana Editorial : शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर काल सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भावनिक साद घातली होती. तसंच ज्यांना मी मुख्यमंत्री नकोय त्यांनी समोर येऊन सांगावं असं आव्हानही दिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरून आता सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं(Shivsena) भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना सावध होण्याचा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

शिवसेनेनं म्हटलं की, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांची राजभवनातील लगबगही थोडी थांबली. राज्य सरकारचे नक्की काय होणार? यावर पैजा लागल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार? यावर चर्चा झडत आहेत. राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला आणि नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार सुरतमधून गुवाहाटीत गेले. यावेळी आसामचे मंत्री स्वागताला होते यावरून शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेनं म्हटलं की, सुरतमध्ये ज्या हॉटेलात हे 'महामंडळ' होते, तेथे महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. पुन्हा सुरतवरून हे लोक आसामला जाताच गुवाहाटी विमानतळावर आसामचे मंत्री स्वागतास हजर होते. यामागचे पेच-डावपेच न समजण्याइतकी राज्याची जनता खुळी नाही. हॉटेल्स, विमान, गाड्या, घोडे, विशेष सुरक्षा व्यवस्था ही भाजप सरकारचीच कृपा नाही काय? आम्हाला तर भारतीय जनता पक्षाच्या नैतिक अधिष्ठानाचे कौतुकच वाटते. कालपर्यंत भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या शिवसेना आमदारांवर हल्ले करणारे, त्यांना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा धाक दाखवून, ''आता तुमची जागा तुरुंगात'' असे बोलणाऱ्या किरीट सोमय्यांचे यापुढे कसे होणार? हे सर्व आमदार कालपासून भाजपच्या गोटात शिरले आहेत आणि दिल्लीतील राजकीय गागाभट्टांनी त्यांना पवित्र, शुद्ध करून घेतले आहे. आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल असे दिसते असा टोलाही लगावला आहे.

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. मात्र त्यांनी सुटका करून घेत पुन्हा मुंबई गाठली. शिवसेनेनं अग्रलेखात असं म्हटलं की, नितीन देशमुख हे अकोल्याचे आमदार सुरतवरून मुंबईस परतले आणि त्यांनी जे घडले, त्याबाबत धक्कादायक असे सत्यकथन केले. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. मुंबईतील 'सागर' बंगल्यावर उत्साहाच्या लाटा उसळल्या असून लाटेचा फेस अनेकांच्या नाकातोंडात गेला आहे, पण भाजप कोणाच्या बळावर सरकार स्थापन करू इच्छिते? नगरविकास मंत्री शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आधी मुंबईत यावे लागेल. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाराष्ट्रीय जनतेच्या नजरेस नजर भिडवून विधान भवनाची पायरी चढावी लागेल. शिवसेनेने उमेदवारी देऊन मेहनतीने निवडून आणले आणि आता शिवसेनेशी बेइमानी का करीत आहात? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.

विधिमंडळात काय व्हायचे ते होईल, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावर आहे. लोकमानसात उद्धव ठाकरे प्रिय आहेत, शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. त्याचमुळे 'वेगळा गट' करून आसामात गेलेल्या लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार व नामदार पुन्हा स्वगृही परत येतील. प्रवाहात सामील होतील. आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील. भाजपची परंपरा तर हीच आहे. त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल असा विश्वासही शिवसेनेनं व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न कुणाला पडलेच असेल तर तो त्यांचा स्वप्नदोष. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील 'जादा' विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे 'माजी' होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, असा सल्लाही शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना दिला आहे.