Kapil Sibal : एकनाथ शिंदे गटाचा बहुमताचा दावा फसवा; सिब्बल यांनी कोर्टात आकडेच सांगितले!
Kapil Sibal on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केला.
Maharashtra Political Crisis Hearing in Supreme Court : महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारची वैधता, आमदारांची पात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, सरकार स्थापनेतील राज्यपालांची भूमिका यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. विधीमंडळ पक्षात आम्हाला पूर्ण बहुमत असल्याच्या शिंदे गटाचा दावा फोल असल्याचा पुरावाच सिब्बल यांनी यावेळी सादर केला.
ट्रेंडिंग न्यूज
शिवसेनेतून फुटून नंतर पक्षावर दावा करताना व आम्हीच खरा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाकडं आमदारांची संख्या हा आधार होता. त्याच आधारावर त्यांनी पक्षाचा नेता, व्हीप आणि विधीमंडळ पक्षाचा नेता बदलला. मात्र, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या बहुमताच्या दाव्याची पोलखोल केली.
संसदीय पक्षात आमच्याकडं बहुमत आहे असा दावा शिंदे यांच्याकडून केला जात आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नसल्याचं सिब्बल यांनी सांगितलं. शिंदे गटाकडं संपूर्ण बहुमत आहे असं नाही. महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवसेनेचे सर्व १२ सदस्य ठाकरे गटासोबत आहेत. विधानसभेत १५ आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. राज्यसभेतील तिन्ही सदस्य आमच्यासोबत आहेत. लोकसभेत सहा खासदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळं चार सभागृहांपैकी दोन सभागृहात ठाकरे गटाकडं बहुमत आहे, असं कपिल सिब्बल यांनी आमदार, खासदारांची आकडेवारी देत सांगितलं.
बहुमत हा शिंदे गटासाठी बचाव होऊ शकत नाही!
शिवसेनेतून फुटलेले ४० लोक दहाव्या परिशिष्टाचा आधार घेऊन स्वत:चा बचाव करूच शकत नाहीत. ते कुठल्याही पक्षात विलीन झाले नाहीत. विधानसभेत आमचं बहुमत असल्याचं ते सांगतात. व्हीप आणि विधीमंडळ पक्षाचा नेता आम्ही बदलू शकतो असा त्यांचा दावा आहे. एकनाथ शिंदे हे स्वत:ला नेता घोषित करतात. मग राजकीय पक्षाचं काय? त्यापूर्वी अडीच वर्षे एकनाथ शिंदे हे याच पक्षाच्या कोट्यातून मंत्रिपद भोगत होते त्याचं काय? अचानक ते म्हणतात आम्ही भाजपमध्ये जाऊ शकतो, गुवाहाटीला जाऊ शकतो. ही कुठली नैतिकता? त्यामुळ दहावं परिशिष्ट त्यांना संरक्षण देऊ शकत नाही, असा सडेतोड युक्तिवाद सिब्बल यांनी केला.