Political Crisis: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Maharashtra Political Crisis : तब्बल ४० दिवसांनंतर प्रकरण खंडपीठाकडे सुनावणीसाठी आलं आहे. त्यामुळं आज कोर्ट काय निकाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल.
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तब्बल ४० दिवसांनंतर प्रकरण आज न्यायालयाच्या कामकाजात पहिल्या क्रमांकावर घेण्यात आलं आहे. त्यामुळं आज सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास प्रकरणावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश उदय लळित यांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाची नियुक्ती केली होती. या खंडपीठात न्या. धनंजय चंद्रचूड यांचाही समावेश आहे. त्यामुळं आता न्यायालय आज काय निकाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कोणत्या प्रकरणांवर होणार सुनावणी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना तात्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रतेची नोटिस बजावली होती. त्याविरोधात शिंदे गटानं आणि समर्थनात शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर राज्यपालांची भूमिका, विधानसभाध्यक्षांचे अधिकार आणि पक्षांतरबंदी कायदा या मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होणार आहेत. त्यामुळं आता कोर्ट कुणाच्या बाजूनं निकाल देणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
खंडपीठात कुणाचा समावेश?
सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या खंडपीठाचं नेत्तृत्व न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यात न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी नरसिंह यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे धाडसी निकाल देण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये ऐतिहासिक निकाल दिलेला आहे. त्यामुळं आजच्या सुनावणीत ते काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जर सुप्रीम कोर्टानं या मुख्यमंत्री शिंदेंना अपात्र ठरवलं तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार संकटात सापडेल. अपात्रतेच्या कारवाईतून बचाव करण्यासाठी शिंदे गटातील आमदारांना दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करावा लागणार आहे.