Aurangabad: शिंदे गटाच्या आमदाराला गावाबाहेर हाकललं; वैजापुरात शिंदे-ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार राडा
Shinde Group vs Thackeray Group : शिंदे गटाचे बंडखोर आमदार रमेश बोरनारे वैजापुरातील महालगावात आले असता त्यांना गावात प्रवेश करण्यापासून ग्रामस्थांनी रोखलं. त्यानंतर दोन्ही गटात जोरदार राडा झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shinde Group vs Thackeray Group In MahalGaon Vaijapur : शिवसेनेच्या ४० आमदारांनी पक्षातून बंड करत राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. परंतु अजूनही अनेक आमदारांचा मतदारसंघात '५० खोके एकदम ओक्के' या घोषणा या घोषणांनी निषेध केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. बंडानंतर उदय सामंत, तानाजी सावंत आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यात आणि ठाकरे समर्थकांत जोरदार राडा झाला होता. त्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना महालगावातून ग्रामस्थांनी हाकलून दिल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं आता आमदार बोरनारेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे हे एका कार्यक्रमासाठी वैजापुरातील महालगावात आले होते. त्यावेळी त्यांना गावात प्रवेश करण्यापासून ठाकरे गटाच्या समर्थकांनी रोखलं. त्यामुळं शिंदे आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. याशिवाय आमदार बोरनारे यांनी ठाकरे गटाच्या समर्थकांना शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गावात प्रवेश करण्याच्या कारणावरून प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचण्याची स्थिती निर्माण झालेली असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवीगाळ केल्यानंतर वाद वाढत असल्याचं समजताच आमदार बोरनारेंनी महालगावातून काढता पाय घेतला.
कोण आहेत आमदार रमेश बोरनारे?
आमदार रमेश बोरनारे हे वैजापूर-गंगापूर मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार आहेत. ते पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले असून एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेनेतून बंड केलं होतं तेव्हा त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंना पाठिंबा दिला होता. याशिवाय बोरनारे हे शिवसेनेचे दिग्गज नेते आरएम वाणी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळं आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैजापुरात एका साखर कारखान्याचं उद्घाटन केलं होतं. परंतु शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्याविरोधात मतदारसंघात मोठा रोष असल्याचं पाहायला मिळत आहे.