Mumbai Air : मुंबईही दिल्लीच्या वाटेवर.. शहरातील हवा मानवांसह अन्य सजीवांसाठी धोकादायक; AQI ३२५ वर
Mumbaiairhighlypolluted : मुंबईतील हवा अतिप्रदुषित झाल्याने मानवासह सजीवांसाठी धोकादायक बनली आहे. जोरदार वारे कमी झाल्याने व थंडी वाढल्याने हवेतील धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे.
दिल्लीतील हवा प्रदुषित झाल्याच्या बातम्या नेहमी येत असतात मात्र मुंबईतील हवेनेही पुन्हा अतिप्रदुषित स्तर गाठला आहे. मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ होत असल्याने मानवासह इतर सजीवांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
ट्रेंडिंग न्यूज
हवा प्रदुषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ‘प्रदूषित’ ते ‘अतिप्रदूषित’ या स्थितीत पोहोचली आहे. शनिवारी मुंबईतील एक्यूआय ३२५ वर पोहचल्याने शहर ‘अतिप्रदूषित’ स्थितीत असल्याचे ‘सफर’ या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले. तर, वांद्रे – कुर्ला संकुलात प्रदूषके आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण प्रचंड वाढल्याने येथील हवा ‘धोकादायक’ स्थितीत असल्याची नोंद झाली.
सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी ॲण्ड वेदर फोरकास्टींग ॲण्ड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावर शनिवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात खालावल्याचे नोंद करण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग मंदावल्याने आणि हवा थंड असल्याने हवेमध्ये प्रदूषके साचून राहत आहेत. त्यामुळे शनिवारी मुंबईची हवा ‘अतिप्रदूषित’ असल्याची नोंद हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीवर झाली. तसेच, कुलाबा, माझगाव, अंधेरी, चेंबूर, मालाड, नवी मुंबई येथील प्रदूषकांची संख्या वाढल्याने हवेची गुणवत्ता खालावलेली होती.
मुंबईतील ठिकाणाचे पार्टीक्युलेट २.५ चे प्रमाण ३०० च्या पुढे असल्याने येथील हवेची स्थिती ‘अतिप्रदूषित’ असल्याची नोंद झाली. तर, माझगाव आणि वांद्रे – कुर्ला संकुल येथील नायट्रोजन डायऑक्साइडचे (एनओ २) प्रमाण अनुक्रमे २३१ आणि २८३ नोंदवण्यात आले. हा वायू धुक्यांमध्ये मिश्रित झाल्यास दृश्यमानता कमी होते. तसेच, मानवी आरोग्यावर या वायूचे घातक परिणाम होतात.
विभाग