Maharashtra weather update : राज्यात विदर्भात ५ तर मराठवड्यातील ३ जिल्ह्यात मतदान होत आहे. मात्र, या मतदानावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, येथे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होऊन वादळी वाऱ्यासह ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल रात्रीपासून अमरावती जिल्ह्यात काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. तर बुलढाणा आणि शेगाव येथे देखील पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात देखील आज पहाटे तुरळक ठिकाणी पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळी पाऊस झाला.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याची चक्रीय स्थिती म्हणजे सायक्लोनिक सर्क्युलेशन मराठवाडा व लगतच्या मध्य महाराष्ट्रावर आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील द्रोणीका रेषा ही मराठवाडा व लगतच्या मध्य महाराष्ट्रावर असलेल्या चक्रीय स्थितीमधून जाऊन ते तमिळनाडूपर्यंत जात आहे. आणखी एक द्रोणीका रेषा ही दक्षिण मध्य महाराष्ट्र व कर्नाटक पर्यंत जात आहे. ही द्रोणीका रेषा विदर्भ व मराठवाड्यातून जात आहे. यामुळे आज संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोवा वगळता पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील दोन ते तीन दिवस वातावरण उष्ण व दमट राहील आज रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणात पुढील पाचही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मेघर्जना विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याचा अंदाज दिला आहे. विदर्भात अकोला बुलढाणा व वाशिम येथे मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी पावसासह गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात मध्ये काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरामध्ये २९ एप्रिल पर्यंत आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. तसेच २६ व २७ एप्रिलला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
विदर्भ मराठवाडा येथे आज दुसऱ्या टप्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान आहे. मात्र, या ठिकाणी आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणी ऊन कमी असल्याने सकाळीच मतदान करण्यास नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. जर आज दुपारी किंवा मध्ये पाऊस झाला तर याचा परिमाण मतदानावर होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
संबंधित बातम्या