शिवरायांचा अपमान झाला तेव्हा बंद का पुकारला नाही?; पत्रकारांच्या प्रश्नावर ठाणे बंद करणारे निरुत्तर
Thane Bandh Today : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळी ठाण्यात बंद का पुकारला नाही?, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.
Thane Bandh Today Live : शिवसेनेच्या नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी केलल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात आज हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. यावेळी ठाण्यात सकाळपासून अनेक ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय वाहतूक बंद असल्यानं अनेक ठिकाणी रस्ते ओसाड पडल्याचं चित्र आहे. हिंदुत्ववादी संघटनांबरोबर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनीही बंदमध्ये सहभागी होत शिवसेना नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर उतरून नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांवर हिंदुत्ववादी नेत्यांची भंबेरी...
सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषद घेत ठाण्यात बंदची घोषणा केली होती. या बंदमागची कारणंही नेत्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, त्यावेळी तुम्ही बंद का पुकारला नाही?, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. यावेळी नेत्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरं न देता काढता पाय घेतला.
हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आज ठाण्यातील बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत स्वत:हून दुकानं बंद केली आहेत. त्याचबरोबर शहरातील काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानं सुरुच ठेवलेली आहेत. याशिवाय शिंदे गटाच्या रिक्षाचालक संघटनेच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून दुकानं बंद करायला सुरुवात केली असून अनेक ठिकाणी रिक्षांची वाहतूक बंद केली आहे. परिणामी ठाण्यातील बसस्थानकावर प्रवाशांची अडचण झाल्याचं पाहायला मिळालं.