Blood Bag Price Hike : महाराष्ट्रात रक्ताच्या बॅगा महागल्या; किंमती पाहून तुमचाही रक्तदाब वाढेल!
Blood Bag Price Hike : आधीच महागाईमुळं हैराण असलेल्या सामान्यांचा रक्तदाब वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण आता रक्त पिशव्यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.
Blood Bag Price Hike In Aurangabad Maharashtra : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाढलेल्या महागाईमुळं सामान्य नागरीक होरपळत असतानाच आता महाराष्ट्रात रक्ताच्या पिशव्यांच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं आता आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका बसला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं रक्ताच्या पिशव्यांचे नवीन दर जारी केले असून त्यात प्रत्येक पिशवीच्या किंमतीत १०० रुपयांची तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं आता रुग्णाच्या आरोग्यासाठी रक्त विकत घेताना नातेवाईकांना आणखी खिसा मोकळा करावा लागणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं रक्तपिशव्यांच्या किंमतीत वाढ केल्यानंतर, खाजगी रक्तपेढीत मिळणारी रक्ताची बॉटल यापूर्वी १४५० रुपयांना मिळत होती, त्यात १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची पिशवी १०५० रुपयांना मिळत होती, त्यात २५० रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता शासनानं रक्तपिशव्यांचे नवे दर लागू केल्यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत रक्त देण्यात असतं. परंतु बाहेरच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या रक्ताच्या पिशवीची किंमत ८५० वरून ११०० रुपये करण्यात आल्याची माहिती घाटी रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
दरवाढीचा सामान्यांना फटका बसण्याची शक्यता...
औरंगाबादेतील घाटी रुग्णालयासह जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये एका महिन्याला सात हजार रक्तपिशव्यांची आवश्यकता असते. खाजगी आणि शासकीय रक्तपेढ्यांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त गोळा करण्यात येत असतं. परंतु आता आरोग्य विभागानं रक्तपिशव्यांची किंमत वाढवल्यामुळं त्याचा रुग्णांना आणि सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.