Winter Session: उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल; बंडखोरीनंतर शिंदे-ठाकरे प्रथमच आमने-सामने
Uddhav Thackeray Assembly Winter Session : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल नागपुरात दाखल झाले होते. त्यानंतर ते आज सभागृहातील कामकाजात भाग घेणार आहेत.
Maharashtra Assembly Winter Session Live Updates : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. विरोधकांनी महापुरुषांचा अपमान आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्लॅन केलेला असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आज विधीमंडळातील कामकाजात सहभागी होण्यासाठी विधानभवनात पोहचले आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना २०१९ साली नागपुरात आले होते. सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच नागपुरात आल्यानं विदर्भातील शिवसैनिकांनी नागपूर विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. त्यामुळं आज ठाकरे अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहे.
उद्धव ठाकरे अद्यापही विधानसभेचे आमदार...
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. परंतु त्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना सभागृहातून सरकारला धारेवर धरण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीमाना न देण्याचा निर्णय घेतला होता.
अधिवेशनात आमदार म्हणून ठाकरेंचा पहिल्यांदाच सहभाग...
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सक्रीय राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदापासून केली होती. त्यानंतर २०१९ साली त्यांनी मविआचा प्रयोग करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. परंतु जुन महिन्यात सरकार कोसळल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळं आता विधानपरिषदेचे आमदार म्हणून ठाकरे पहिल्यांदाच विधीमंडळात आले आहेत. त्यामुळं ठाकरे हे शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात घेरणार असल्याचं बोललं जात आहे.
ठाकरेंनी विदर्भात येण्यापेक्षा मुंबईत काचेच्या केबिनमध्ये रहावं- बावनकुळे
उद्धव ठाकरेंनी नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात सहभागावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे विदर्भात आले नाहीत. त्यामुळं त्यांनी विदर्भात येण्यापेक्षा मुंबईच्या काचेच्या केबिनमध्ये रहावं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आता उद्धव ठाकरे नागपुरला येऊन काय उपयोग होणार आहे?, असा सवाल करत बावनकुळेंनी ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.