Eknath Shinde on OPS : शिक्षकांसमोर बोलताना जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान
Eknath Shinde on Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.
Eknath Shinde on Teachers Recruitment : जुन्या पेन्शन योजनेवरून सरकारी कर्मचारी आक्रमक झाल्यामुळं सत्ताधाऱ्यांचा सूर काहीसा मवाळ झालेला दिसत आहे. त्यातच विधान परिषद निवडणुकीतील पराभवात हा मुद्दा प्रभावी ठरल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या काळात शिक्षकांची ३० हजार रिक्त पदं भरणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
ट्रेंडिंग न्यूज
वेंगुर्ला इथं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात आज झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर या अधिवेशनाचा शुभारंभ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 'शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं.
'आपल्या देशात गुरुला फार महत्व आहे. आई-वडिलानंतर गुरुचं, शिक्षकांचं स्थान हे आयुष्यामध्ये सर्वांच्या आदराचं आहे. शिक्षक हे भावी पिढीवर चांगले संस्कार घडवित असतात. समाज घडविण्याचं काम आपण करत असतात. त्यामुळं शिक्षकांच्या दृष्टीनं चांगले निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. शिक्षकांवरील बंधनं कमीत कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. डॉक्टरांच्या वाहनांवर जसा डीआर लागतो, त्याच धर्तीवर शिक्षकांच्या वाहनांवर टीआर लावण्याबाबत विचार होईल. जेणेकरुन शाळेत लवकर पोहचता येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
आमच्या सरकारनं मागील सहा-सात महिन्यांमध्ये शेतकरी, शिक्षक, कष्टकरी, कामगार तसेच विद्यार्थीं या सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्य घटक वंचित राहू नये, असे केंद्रबिंदू मानून निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील घटकांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय घेतले आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
शिक्षकांची ३० हजार पदं भरणार
'केंद्र सरकारचं नवीन शैक्षणिक धोरण हे भविष्य काळातील सुवर्णसंधी आहे. या धोरणानुसार राज्यातील सर्व मुला-मुलींना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं काही निर्णय घेतले आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. केंद्र प्रमुखाची रिक्त पदं भरण्याचं कामही सुरू आहे. शिक्षकांची सुमारे ३० हजार पदं लवकरच भरली जातील. शिक्षकांच्या मागणीच्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
विभाग