मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Saamana Editorial: भाजप व त्यांचे सध्याचे सूत्रधार नामर्द आहेत म्हणूनच...; ‘सामना’तून हल्लाबोल

Saamana Editorial: भाजप व त्यांचे सध्याचे सूत्रधार नामर्द आहेत म्हणूनच...; ‘सामना’तून हल्लाबोल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 11, 2022 12:13 PM IST

Saamana Editorial : शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यानंतर आता निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

Udhhav Thackeray vs Eknath Shinde On Party Symbol
Udhhav Thackeray vs Eknath Shinde On Party Symbol (HT)

Uddhav Thackeray attacks BJP in Saamana Editorial : काल निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव आणि मशाल हे चिन्ह बहाल केलं आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव दिलं असून त्यांना आयोगाकडून आज नवं चिन्ह देण्यात येणार आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

सामनाच्या अग्रलेखात शिंदे गटाचा उल्लेख 'मिंधे गट' असा करण्यात आला आहे. शिवसेनेत शिवरायांचा अंश असून शिंदे गट ही अफजल खान आणि औरंग्याची अवलाद असल्याची टीका ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे. त्यामुळं आता निवडणूक चिन्हावरून आणि पक्षावरील वर्चस्वावरून दोन्ही गटातील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

ठाकरे आणि शिवसेनेचं आस्तित्त्व संपवण्यासाठी नामर्द भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या सध्याच्या सूत्रधारांनीच हे सगळं घडवून आणलं आहे. भाजप या सगळ्या कटाचा सूत्रधार असून भविष्यात या खोकेबाज आणि मिंध्या आमदारांवर जनता थुंकेल, अशा शब्दांत ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली आहे.

शिंदेंच्या मुखवट्यामागे भ्रष्ट आणि बेईमान चेहरा- ठाकरे

शिंदे गटानं शिवसेनेसोबत आणि ठाकरेंसोबत गद्दारी केली असून त्यांच्या मुखवट्यामागे भ्रष्ट आणि बेईमान चेहरा आहे. राज्यातील जनतेनं या महाराष्ट्राच्या शत्रूंना दफन करायला हवं, याशिवाय गद्दारांना कायमचं गाडून त्यांच्या 'कायमचं गाडलं', असं त्यांच्या थडग्यांवर लिहायला हवं. तुमची नातवंडंही अशा थडग्यांवर थुकतील, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

दीपक केसरकरांवरही शिवसेनेचा हल्लाबोल...

मंत्रीपदाचं गाजर दिसल्यानं दीपक केसरकरांसारखा बाजारबुणगा व्यक्ती शिंदे गटात गेले. अनेक पक्षांत फिरून ते शिवसेनेत आले होते. त्यामुळं ते कुणाचेच होऊ शकणार नाहीत, अशी टीका ठाकरेंनी शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकरांवर केली आहे. याशिवाय सर्व प्रकारचे हल्ले पचवून शिवसेना खंबीरपणे उभी आहे, या गद्दारांना जनताच उत्तर देईल, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी अग्रलेखातून व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point