मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या जहरी टीकेमुळं एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, सामान्य माणसं जोडे मारतील!

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या जहरी टीकेमुळं एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, सामान्य माणसं जोडे मारतील!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 27, 2023 07:48 PM IST

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच जोरदार उत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray - Eknath Shinde
Uddhav Thackeray - Eknath Shinde

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रथमच ट्विटरवर सविस्तर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत हल्ला चढवला आहे.

भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आज भाषण केलं. त्यावेळी बोलताना भाजप व शिंदे गटावर त्यांनी जोरदार टीका केली. जोडे पुसण्याची लायकी असलेले लोक सध्या राज्य करत आहेत, महाराष्ट्राचं काय होणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेमुळं शिंदे दुखावले आहेत.

Uddhav Thackeray : स्वत: जागा सुचवूनही आता बारसू रिफायनरीला विरोध का?; उद्धव ठाकरेंनी केला खुलासा

शिवसेना सोडल्यापासून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबावर फार टीका करणं टाळलं होतं. एखादी कोटी करून किंवा एक-दोन वाक्यांत ते प्रतिक्रिया देत. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वावरच त्यांनी प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे.

'काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळालं की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसं तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचं आयुष्य जातं. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात, असं शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Sushma Andhare : संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? सुषमा अंधारेंनी ठोकला तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

‘चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे,’ असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.

लोक मतदानातून जोडे मारतील!

'केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की, असा संतप्त टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता हाणला आहे.

IPL_Entry_Point