मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ved: 'वेड'मधील शेवटच्या चुंबन दृश्याची खरोखरच गरज होती का?; प्रेक्षकांमध्ये रंगली चर्चा

Ved: 'वेड'मधील शेवटच्या चुंबन दृश्याची खरोखरच गरज होती का?; प्रेक्षकांमध्ये रंगली चर्चा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 11, 2023 03:36 PM IST

Ved Marathi Movie: ‘वेड’ या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘वेड’ पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला या चित्रपटाने वेड लावलंय.

ved
ved

Ved Marathi Movie: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘वेड’ पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला या चित्रपटाने वेड लावलंय, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटत आहे. प्रेक्षक आणि समीक्षक या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. मात्र, असं असतानाचा काही प्रेक्षकांनी या चित्रपटातील एका दृश्यावर आपला आक्षेप देखील नोंदवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘वेड’ या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची कथा तीन व्यक्ती, संसार आणि प्रेम याभोवती गुंफली गेली आहे. या चित्रपटात अॅक्शन आणि रोमान्स अशा दोन्ही गोष्टी पुरेपूर पाहायला मिळाल्या आहेत. अनेकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह या चित्रपटाचा आस्वाद घेतला आहे. मात्र, या चित्रपटाच्या शेवटला नायक-नायिकेचं चुंबन दृश्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळालं. आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट बघत असताना हे दृश्य पाहून अवघडल्यासारखं वाटत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

तर, बॉलिवूड चित्रपटाचा टच देण्यासाठी हे दृश्य ‘वेड’ चित्रपट टाकण्यात आले असावे, असे देखील चाहते म्हणत आहेत. संपूर्ण चित्रपटात एक दमदार कथा सदर केल्यानंतर शेवटला खरंच चुंबन दृश्याची गरज होती का?, असा सवालही प्रेक्षकांनी केला आहे. तर, काही प्रेक्षकांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटलं की, हे चुंबन दृश्य कथेचा इतका महत्त्वाचा भाग नव्हते, त्यामुळे ते टाळता देखील आले असते. आई-वडील, भाऊ-बहीण, मुलांसह चित्रपट पाहताना हे दृश्य पाहून अतिशय अवघडल्यासारखं वाटत आणि त्यामुळे गोंधळ उडतो. मात्र, या चित्रपटाची कथा आणि एकूण चित्रपट अतिशय दमदार असल्याचे देखील प्रेक्षकांनी म्हटले आहे.

‘वेड’ या चित्रपटात जिनिलीया आणि रितेश देशमुखसोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. तसेच, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर देखील धुमाकूळ घातला आहे.

IPL_Entry_Point